शाळांतील अभ्यासक्रमात २५टक्के कपात करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय : शिक्षण मंत्र्याचे व्टिट!

ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी पासून शिक्षणाच्या अभ्यासक्रमात अनेक अनपेक्षीत बदल करावे लागले आहेत. त्यामध्ये मागील वर्षी २५टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती. कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर यावर्षीही शैक्षणिक वर्ष आँनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे.

    मुंबई : राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्टिट व्दारे दिली आहे.

    अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याची मागणी

    ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी पासून शिक्षणाच्या अभ्यासक्रमात अनेक अनपेक्षीत बदल करावे लागले आहेत. त्यामध्ये मागील वर्षी २५टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती. कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर यावर्षीही शैक्षणिक वर्ष आँनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणा-यांसाठी अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.

    संसर्गाच्या भितीने शाळा बंद – शिक्षण सुरू

    सध्या अनेक ठिकाणी कोविड-१९चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थांचे ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे, मात्र ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड- १९ च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर जगाभरात विद्यार्थ्याना संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने शाळा बंद आणि शिक्षण मात्र सुरू आहे.

    तणावमुक्त वातावरणात पाठ्यक्रम पूर्ण व्हावा

    विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने २५% अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा आणि तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत, या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.