साईबाबा संस्थान विश्वस्त नियुक्तीसाठी शासनाने बदलला नियम; आता ३१ जुलैपर्यंत विश्वस्त मंडळाची घोषणा

    अहमदनगर : साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर नियुक्ती करुन राजकीय पुनर्वसनसाठी आडवा येणारा नियमच सरकारने बदलला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत त्याला दुजोरा दिला. ३१ जुलैपर्यंत नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

    शिर्डी येथील साई संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीचा वाद कोर्टात पोहोचला असून, त्यावर आज ७ जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, सरकारने पुन्हा मुदतवाढ मागितल्याचे आज स्पष्ट झाले. संस्थानचे विश्वस्त म्हणून वर्णी लावत राजकीय पुनर्वसन करण्याची परंपरा आहे. कोर्टाच्या नियम, अटीमुळे त्यात बाधा निर्माण होत होती. सामाजिक क्षेत्रात दहा वर्ष अनुभव ही त्यातली एक अट होती. या जाचक अटीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याने हा नियमच बदलण्यात आला आहे.

    आता सामाजिक कार्याची अनुभवाची मुदत दहा वर्षांवरून पाच वर्षे करण्यात आली आहे. शासनाच्या विधी व न्याय विभाग या नव्या नियमानुसार विश्वस्त निवड करणार आहे. ३१ जुलैपर्यंत ही निवड पूर्ण होईल असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

    अध्यक्ष, विश्वस्त कोण? मला नाही माहिती

    संभाव्य अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे नाव समोर आले होते. याशिवाय विश्वस्तांची नावेही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तिचं नावे अंतिम आहेत का? असे विचारता पालकमंत्री मुश्रीफ यांनी ‘ते मला नाही माहिती’ असे उत्तर दिले. पालकमंत्री या नात्याने अध्यक्ष व विश्वस्तांची यादी मला समजेल, असे म्हणत तो अधिकार मला नसल्याचे ते म्हणाले.

    विश्वस्त नियुक्ती नियमाचा आधार घेत काही सामाजिक कार्यकर्ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात. त्यामुळे विश्वस्त नियुक्ती नेहमीच वादात सापडते. आता ही नियुक्ती वादात सापडणार नाही, याची पुरेपूर दक्षता महाविकासआघाडी सरकारने घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी नियमात बदल केला असल्याची अंदाज वर्तविला जात आहे.