नगर शहरातील लॉकडाऊन शिथिल करावे; शिवसेनेची मनपा आयुक्तांकडे मागणी

अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. या लॉकडाऊनची वेळ ही दुपारी 4 वाजेपर्यंतची आहे. अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे.

    नगर : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या काळात नगर शहरात गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने नियम शिथिल करुन ही लॉकडाऊनची वेळ रात्री 8 पर्यंत करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, युवा जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, परेश लोखंडे आदि उपस्थित होते.

    आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. या लॉकडाऊनची वेळ ही दुपारी 4 वाजेपर्यंतची आहे. अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील छोटे व्यापारी, व्यावसायिक, फेरीवाले यांच्या व्यवसायावर परिणाम होत असून, त्यांचे अनोनात हाल होत आहे. व्यावसायिक घडी बसविण्यासाठी अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रासाठी लॉकडाऊनचे नियम शिथील करावेत व व्यवसायिकांना रात्री 8 वाजेपर्यंत व्यावसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

    यावेळी विक्रम राठोड म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. परंतु सर्वांच्या प्रयत्नाने आता रुग्णसंख्या कमी होत आहे, ही चांगली बाब आहे. परंतु या कालावधीत लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता नगर शहरातील रुग्णसंख्या कमी असल्याने लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता करुन व्यावसायिकांना रात्री 8 पर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी मिळण्यास हरकत नाही. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या गृहित धरुन त्या-त्या ठिकाणी लॉकडाऊन सुरु ठेवावे. शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते, अशा परिस्थितीत आम्ही व्यावसायिकांच्या पाठिशी उभे आहोत, असे त्यांनी सांगितले.

    याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन महत्वाचे आहे, परंतु ज्या भागात रुग्णसंख्या कमी आहे, अशा ठिकाणी शिथिलता मिळणे आवश्यक आहे. कारण लॉकडाऊनमुळे व्यावसायिक व त्यांच्यावर अवलंबून असणार्‍यांना मोठ्या त्रासास तोंड द्यावे लागत आहे. तरी नगर शहरातील लॉकडाऊन कमी करावे, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे सांगितले. याप्रसंगी आयुक्तांशी शिष्टमंडळाची विविध विषयांवर चर्चा होऊन याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी बोलून निर्णय घेऊन, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.