झपाटून काम करणारा असा नेता, अजितदादा

शरद पवार यांना ७० वर्षे झाली तेव्हा त्यांच्यावर ‘एकमेव’ ग्रंथ केला. काही मुलाखती घेण्यासाठी बारामतीला गेलो होतो. अजितदादांच्या मातोश्रींनाही भेटलो. सहज विचारले, ‘अजितदादा घरी किती दिवस येतात..’ मातोश्री म्हणाल्या... ‘येतोय असा निरोप येतो, मग वाट पहात दारात उभी राहते, तास-दोन तासांनी आला, तर सांगायला लागतो घाईत आहे, नमस्कार करतो, दोन मिनिट टेकतो पुन्हा धावपळीत जातो..... तो गेला की पुन्हा पाठमोऱ्या आकृतीकडे मी आपली पहात राहते...

    अजित पवार आज ६१ वर्षांचे झाले आहेत. ६१ वर्ष म्हणजे पूर्ण अनुभवांचे वर्ष समजले जाते. पुढची २५-३० वर्षे तरी अजित पवार या व्यक्तिमत्वाला गेल्या ३०-४० वर्षांतील झपाटलेल्या कामाची ऊर्जा नक्की पुरेल आणि उरेलसुध्दा.  महाराष्ट्राच्या  राजकारणात अजित पवार यांचा थेट प्रवेश तसा ३० वर्षांपूर्वीचा. पण त्यापूर्वी किमान १५ वर्षे तरी १० संस्थांचे संचालक आणि नंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अशा अनेक संस्थांमधून अनुभव आणि ऊर्जा घेत दादा ६१ व्या वर्षी त्याच ऊर्जेने काम करत आहेत. ही उर्जा बारामतीच्या पवार घराण्याचीच ऊर्जा आहे. शरद पवार यांच्या मातोश्री शारदाताई यांच्यामुळेच शरद पवार असोत किंवा अजितदादा असोत, हा ऊर्जेचा स्त्रोत अखंड आहे.

    मी ६०-६२ वर्षे पत्रकारितेत आहे. अजितदादांशी माझा तसा रोजचा परिचय नाही. रोजचे जाणे-येणे नाही. दादा महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यापासून म्हणजे गेल्या ३० वर्षात दादांची  भेट ५-१० वेळासुध्दा झाली नसेल. जी झाली असेल, ती अशी उडती… घाईघाईची. याचे कारण दादा निवांत बसले आहेत असे कधी पहायला मिळालेच नाही.

    गेल्या ६० वर्षांत शरद पवारांची भेट न मोजता येईल इतक्यावेळा झाली आहे. माझ्या अनेक कार्यक्रमांना ते आले, चर्चाही होते. तेही प्रचंड ऊर्जेने काम करतात. त्यांचा दिवसही सकाळी ७ वाजता सुरु होतो. इतर राजकीय नेते जेव्हा उठून कामाला लागतात. तेव्हा शरद पवार यांचे चार तास काम झालेले असते.  पण, तुलना करायची म्हणून नाही. शरद पवारांच्या तोडीचा आणि वकुबाचा नेता मला देशात दिसत नाही. पण काहीवेळा असे वाटते, की अजितदादा शरद पवार यांच्या मैलभर पुढे आहेत. कारण, या महाराष्ट्रातला कोणत्याही पक्षाचा ज्येष्ठ नेता सकाळी ८ वाजता पक्षाच्या कार्यालयात जात असेल, असे एकही उदाहरण देशात नसेल. ९ वाजता मंत्रालयात पोहोचणारा मंत्री दादांशिवाय दुसरा कोणी असेल असे वाटत नाही. कोरोना काळातील जी माहिती आहे, ती अशी आहे की, मंत्रालयात सर्वात अगोदर पोहोचणारा मंत्री आणि सर्वात शेवटी मंत्रालय  सोडणारा मंत्री… त्याचे नाव अजितदादा.

    एवढा झपाटून काम करणारा मंत्री मी काय पाहिलेला नाही. मी त्यांच्या तसा अजिबात जवळ नाही. मी त्यांना लांबूनच पाहतो आहे आणि लांबूनच लिहितो आहे. तसे म्हटले तर दादांचा लांबून पाहिलेला स्वभाव असा आहे की, ते कोणाला फारसे जवळ करत नाहीत आणि काम होण्यासारखे असेल तर खेपा घालायला लावत नाहीत. काम होईल म्हणाले तर होईल… नाही म्हणाले, तर जन्मात होणार नाही. स्वभाव काहीसा फटकळ पण, मनाने हा माणूस नेता नाही, कार्यकर्ताच आहे. शरद पवार यांच्याबद्दलचा त्यांच्या मनातील आदर कल्पना येणार नाही, इतका खोल आहे.

    मंत्रालयात फाईलवर नजर टाकली की, ज्याला फाईल समजते असे जे दोन-चार मंत्री असतील, त्यात दादा पहिले आहेत. आणखी एक गूढ प्रश्न मनात असतो. झपाटून काम करणारा हा माणूस आजच्या काळातल्या राजकीय मार्केटिंगपासून खूप लांब आहे. प्रसिध्दीसाठी ते हापापलेले आहेत, असे कधी बघितले नाही.

    एक व्यक्तिगत अनुभव सांगतो. माझी पुतणी डॉ. संगिता वेलणकर हिचे पती डॉ. महेश वेलणकर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात आ.एम.ओ होते. एके दिवशी रुग्णालयात शिरत असताना रुग्णालयातून येणाऱ्या वॉटर टँकरने त्यांना उडवले आणि ते जागीच ठार झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना मी, माझ्या डॉक्टर पुतणीला ११-११ महिन्यांच्या तात्पुरत्या नोकरीवर लावली. ११ महिन्यांनंतर नोकरी थांबायची. पुन्हा पिच्छा पुरवला की ऑर्डर निघायची. या कामात विलासराव ते अशोक चव्हाण आणि आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर,  विमल मुंदडा, सुरेश शेट्टी या सर्वांनी मदत केली.

    २०१० ला पृथ्वीराजबाबा आले. त्यावेळी पुतणीच्या नोकरीत खंड होता. मी बाबांकडे अर्ज दिला. ते म्हणाले,…  ‘मधुकरराव, आपल्याला आता ताकसुध्दा फुंकुन प्याव लागेल…. त्यांच्या हातातला अर्ज त्यांनी खाली ठेवून दिला. तेवढ्यात अजितदादा तिथे आले. मला खुणेनेच विचारले काय काम काढलत? मी काहीच बोललो नाही. मी बाहेर पडलो, पाठोपाठ दादा बाहेर पडले. माझा हात धरुन म्हणाले ‘चला कार्यालयात’ मी त्यांच्यासोबत गेलो. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे काय काम होते काय असे विचारले, मी विषय सांगितला. त्यांनी फोन उचलला. ‘आरोग्य संचालकांना फोन लावला…’ फोन लागला, दादांनी तपशील सांगितला. फोन ठेवला मला म्हणाले ‘४ वाजता ११ महिन्यांची ऑर्डर घेवून जा आणि ४ वाजता त्यांची ऑर्डर आली. दादांच्या कामाचा तडाखा हा असा…

    शेवटचा मुद्दा : शरद पवार यांना ७० वर्षे झाली तेव्हा त्यांच्यावर ‘एकमेव’ ग्रंथ केला. काही मुलाखती घेण्यासाठी बारामतीला गेलो होतो. अजितदादांच्या मातोश्रींनाही भेटलो. सहज विचारले, ‘अजितदादा घरी किती दिवस येतात..’ मातोश्री म्हणाल्या… ‘येतोय असा निरोप येतो, मग वाट पहात दारात उभी राहते, तास-दोन तासांनी आला, तर सांगायला  लागतो घाईत आहे, नमस्कार करतो, दोन मिनिट टेकतो पुन्हा धावपळीत जातो… तो गेला की पुन्हा पाठमोऱ्या आकृतीकडे मी आपली पहात राहते…

    मधुकर भावे

    ज्येष्ठ पत्रकार