- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही
अकोला (Akola). जिल्ह्यातील मागील अनेक वर्षापासून अपूर्ण राहिलेले नेरधामणा, घुंगशी, कवठा, कारंजा रमजानपूर, शहापूर तसेच तेल्हारा तालुक्यातील चिपी लघु प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण होतील, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
या बॅरेजेस व जलप्रकल्पाबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अमोल मिटकरी, राज्याचे जलसंपदा प्रधान सचिव डॉ चंद्रा व विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत मंत्रालयात जलसंपदा मंत्री यांच्या दालनात अकोला जिल्हा संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रखडलेली बॅरेजेसची कामे जून अखेरीपर्यंत पूर्ण होतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. या बैठकीमध्ये राज्यातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागपूर व अमरावतीवरून व्हिडिओ कॉफरन्सद्वारे भाग घेतला. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत लवकरच जलसिंचनाचा प्रश्न सुटावा या उद्देशाने महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन यावेळी अमोल मिटकरी यांनी केले.