
चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र, तो अत्यवस्थ झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
कोल्हापूर : पावसाळ्याच्या दिवसात झाडाझुडपात अनेकदा विषारी साप आढळतात. अनेकदा शेतात सर्पदंश होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस येतात. मात्र, साप चावल्याच्या भीतीने अंगात ताप भरुन एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. अर्णव नवनाथ चौगले (वय 8 वर्षे) असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमका प्रकार काय?
कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वाकर येथे ही दुर्देवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय अर्णवचा शाळेतून घरी येत असताना सापावर पाय पडला. त्याला सर्पदंश झाला नव्हता मात्र, भीतीमुळे तो अस्वस्थ झाला. त्यामुळे त्याच्या अंगात ताप भरला. उपचार सुरु असताना अर्णवचा दुर्देवी मृत्यू झाला.
साप चावल्याच्या भीतीने अंगात भरला ताप
अर्णव इंग्रजी माध्यमात दुसरीच्या वर्गात शिकत होता. चार दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत होता. यावेळी त्याचा सापावर पाय पडला होता. अर्णवने घरी येऊन सगळ्यात आधी आईवडिलांना याबद्दल सांगितलं. आईवडिलांनी निरखून पाहिले असता, त्याच्या पायावर कोणत्याही प्रकारचा ओरखडा किंवा दात वगैरे नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनातली भीती काहीशी दूर झाली होती. मात्र, चिमुकला अर्णव यामुळे भीतीने प्रचंड घाबरला होता. भीतीमुळे त्याच्या अंगात ताप भरला. त्याचा ताप कमी होत नसल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, संर्पदंशाची कोणतीही लक्षणे दिसत नाही आणि तापही कमी येत नसल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चिमुरडा अर्णव अत्यवस्थ झाला. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच रविवारी सायंकाळी त्याचा दुर्दैवी अंत झाला. अशाप्रकारे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.