
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक कंटेनर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात (Accident Near Anewadi Toll Plaza) दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. कंटेनरने दुचाकीला फरफटत नेल्याने महिलेच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
वाई : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक कंटेनर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात (Accident Near Anewadi Toll Plaza) दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. कंटेनरने दुचाकीला फरफटत नेल्याने महिलेच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. हा अपघात चुकीच्या रस्ता नियोजनामुळे झाला असून, तीन लेनचे दोन लेनमध्ये विस्तारीकरण असल्यानेच हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत भुईंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आनेवाडी टोलनाक्याच्या पुढील बाजूस सातारा बाजूकडून पुण्याकडे कंटेनर (NL 01 Q 6794) हा दोन नंबरच्या लेनमधून जात होता तर तीन नंबरच्या लेनमधून मधुकर गोवींद पटवर्धन (वय 72) व पत्नी विद्या मधुकर पटवर्धन (वय 62 रा.मिरज जि.सांगली) हे दाम्पत्य दुचाकीवरुन पुणे बाजूकडे निघालेले होते. मात्र, पुलानजीक तीन लेनचे दोन लेनमध्ये विस्तारीकरण असल्याने त्या ठिकाणी हा अपघात झाला. त्यात विद्या पटवर्धन या कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्या व जागीच ठार झाल्या. तसेच त्यांचे पती मधुकर पटवर्धन हे गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघताची माहिती मिळताच भुईंज पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक रत्नदिप भंडारे व सर्व सहकारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. मधुकर पटवर्धन यांना तात्काळ सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून, कंटेनरचालक अंकुर पटेल (मानखुर्द, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल झाला. या अपघाताचा तपास भुईंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय धायगुडे करीत आहेत.