उत्तर प्रदेशातील रासायनिक कारखान्यामध्ये स्फोटात १२ जणांचा मृत्यू

    उत्तर प्रदेशमध्ये एका रासायनिक कारखान्यात स्फोट झाल्याने तब्बल १२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ४ जून रोजी घडली. याआधी हा आकडा ८ होता. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या आणखी चार कामगारांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १२ वर पोहोचली. या स्फोटात जवळपास २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

    हापूर जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला. अचानक स्फोट झाल्यामुळे येथे मोठी खळबळ उडाली. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर, या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत.