घरांचे काम उत्तम दर्जाचे करा, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचना, ३३ घरांसाठीची निविदा लवकरात लवकर काढा…

५ कोटी रुपयातून २४ घरांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ३३ घरांच्या बांधकामासाठी ‍सिडकोने निधी मंजूर केला आहे.

    चिपळूण : शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे तिवरे (भेंदवाडी) धरणग्रस्त कुटूंबियांच्या घरासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता डी. आर. हरताळकर, प्रांतधिकारी आकाश लिगाडे, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजीप मारसे आदींसह तिवरे ग्रामस्थ उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, सिध्दीविनायक ट्रस्टच्या वतीने ५ कोटी रुपयातून २४ घरांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ३३ घरांच्या बांधकामासाठी ‍सिडकोने निधी मंजूर केला. त्यासाठीचे अंदाजपत्रक सिडकोने बनवावे, यासाठीची निविदा लवकरात लवकर काढा. घरांचे काम उत्तम दर्जाचे करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. ३३ घरांपैकी १४ घरे धरणाकडे बांधण्यात येणार असून, त्यासाठी सीएसआर मधून जागा देण्यात आली आहे. बाकीचे घरे ही अलोरे येथे बांधण्यात येणार आहेत.

    पालकमंत्री म्हणाले, पूर्वी जी २४ घरे बांधण्यात आली त्यासाठीची निविदा कमीमध्ये आल्याने रक्कम शिल्लक आहे. ही रक्कम या घरांच्या नुतनीकरण, इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वापरावी, अशी सूचना त्यांनी संबंधितांना देण्यात आली आहे यासाठी सिडकोमधील जादा रक्कमही वापरावी असे ते म्हणाले. रुद्रच्या नावावर आलेले रक्कम १८ वर्षांनंतर त्यालाच मिळावी. यामध्ये कोणत्याही नातेवाईकांचा हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सक्षम प्राधिकरणाने ही रक्कम एफडी स्वरुपात ठेवावी आणि ती रक्कम १८ वर्षानंतर त्यालाच मिळेल, याची दक्षता घ्यावी. यानंतर पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान संदर्भातील येथील कामकाजाचा आढावा घेतला आहे.

    अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठेंचे आश्वासन 

    अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि. या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे उपस्थित होते. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि.चे अध्यक्ष प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार प्रवीण लोकरे व इतर मान्यवरांचे स्वागत केले. शुभांगी साठे यांनी प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पातील उत्पादन प्रक्रिया, ईटीपी प्रकल्प, व्यवस्थापन पद्धती, स्वच्छता, सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेली काळजी आदींची पाहणी करून साठे यांनी प्रकल्पाचे कौतुक केले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. वाशिष्ठी डेअरीची सर्वच उत्पादने दर्जेदार आहेत. शासनाच्या सर्व प्रमाणकांचे पालन करून या दुग्धप्रकल्पातील उत्पादन सुरू आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनाच्या स्तरावर लागणारे सर्व सहकार्य या प्रकल्पाला निश्चितच केले जाईल, असे आश्वासनही यावेळी शुभांगी साठे यांनी दिले.