महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा, आम्ही आहोत म्हणून सत्ता; अशोक चव्हाणांचं विधान

'राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे', असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रमाणिक भूमिका असल्याचेही अशोक चव्हाण म्हणालेत.

    जालना : ‘राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे’, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रमाणिक भूमिका असल्याचेही अशोक चव्हाण म्हणालेत. जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

    चव्हाण नेमकं काय म्हणाले? 

    राज्याचा विकासाचा गाडा हा पुढे चालत राहीला पाहिजे, यासाठी महाविकास आघाडीचे सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. स्थानिक पातळीवर जरी आम्ही वेगवेगळे निर्णय घेतले तरी हरकत नाही. मात्र, राज्य व्यवस्थीत चालले पाहिजे, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असल्याचेही ते म्हणाले. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयान जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाने आमची सर्वांचीच निराशा झाल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

    आरक्षणावरुन भाजपवर निशाणा

    भजपला देशातील, राज्यातील आरक्षण संपून टाकायचे असल्याचा आरोप यावेळी अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळेचं भाजप असहकार्याची भूमिका दाखवत असल्याचे चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने योग्य भूमिका घेतली नाही.  मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकारने 50 टक्क्यांची अट न काढता अधिकार राज्यांना दिले. त्यांनी कायद्यात बदल केला नाही. संसदेत कायदा केला असता तर मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असता. मात्र, केंद्र सरकारला 50 टक्क्यांच्या वर आरक्षण द्यायचेचं नाही असे म्हणत चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला.

    दरम्यान केंद्र सरकारला मराठा समाजाला, ओबीसींना आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचंच नाही. पुढील 2 वर्षात देशात आरक्षण ठेवायच नाही, असे भाजपने ठरवले आहे. हे भाजप सरकार म्हणजे धोक्याची घंटा आहे. सरकार जेवढ लवकर जाईल तेवढा लवकर बारा बलुतेदारांना मोकळा श्वास मिळेल असे अशोक चव्हाण म्हणाले.

    तसेच आता भाजपवर किती विश्वास ठेवायचा? असा सवालही त्यांनी केला. केंद्र सरकार इंम्पिरीकल डेटा देण्यास का नकार देत आहे, असा सवालही यावेळी चव्हाण यांनी केला.