
नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील हावडा येथील एका झोपडपट्टीत राहत असलेल्या सुलताना यांनी आपण मुघल शासकाचे पणतू मिर्झा मोहम्मद बेदर बख्त यांची पत्नी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अखेरचे मुघल शासक बहादूर शाह जफर यांची वारसदार असल्याचा दावा करत लाल किल्ला आपल्या नावे करण्याची मागणी करणाऱ्या सुलताना यांची याचिका दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली.
याचिकेत सुलताना बेगम यांनी काय म्हटलं?
याचिकेत सुलताना बेगम यांनी लाल किल्ल्याच्या बेकायदेशीरपणे ताबा घेतला असल्याने सरकराने आपल्याला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली होती. याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने १९६० मध्ये बख्त यांना बहादूर शाह यांचा वारसदार म्हणून ग्राह्य धरलं होतं. यानंतर त्यांना पेंशनही मिळत होती.
दरम्यान न्यायमूर्ती रेखा पाटील यांनी महिलेच्या वकिलाला विचारलं की, ‘तुम्हाला कोर्टात दाद मागण्यासाठी इतका उशिर का झाला ते सांगा. मालकी मिळणार की नाही याचा विचार तर सोडूनच द्या, कारण तुमच्या याचिकेतील पहिल्याच ओळीत ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा उल्लेख तुम्ही केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.’ तुमच्या म्हणण्याप्रमाणे १८५७ मध्ये अन्याय झाला. १७० वर्षांनी तुम्ही कोर्टात आला आहात, इतका उशीर का झाला हे सांगू शकता का? यानंतर आपण तुमच्या लाल किल्ल्याच्या मालकीबाबत पाहूयात. तुमच्या म्हणण्याप्रमाणे लाल किल्ल्याचा वापर करत असलेल्या सर्वांना आम्हाला परवानगीविना वापर करु नका असं सांगायचं आहे, असं कोर्टाने यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान कोर्टाने यावेळी ही याचिका म्हणजे वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे, उशीर झाल्याचं सांगत फेटाळून लावली.