तीन मुलांच्या आईसोबत जुळलं अल्पवयीन मुलाचं लग्न; लग्नाची तारीखही ठरली पण तेवढ्यात….

अल्पवयीन मुलाचं प्रेम जडलं ते वर्ध्यातल्या तीन मुलांची आई असलेल्या एका महिलेवर. नजरेच्या एका कटाक्षात मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाने अंतिम निर्णय घेतला तो विवाह बंधनात अडकण्याचा मात्र....

    अमरावती (Amravati) : जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील मुलगा मजुरीसाठी अनेकदा वर्धा जिल्ह्यात जायचा. तिथेच या अल्पवयीन मुलाचा एका वयस्कर महिलेशी संपर्क आला. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि काही दिवसातच मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झालं. सदर महिलेने या अल्पवयीन मुलाला आपण विवाहित असून तीन लहान मुलाची आई असल्याची माहिती सुद्धा दिली. मात्र आकर्षणाच्या ओघात वाहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आणि वयस्कर महिलेच्या प्रेमाच्या गाठी भेटी सुरु झाल्यात. गावात यांच्या प्रेमप्रकरणाच्या बऱ्याच चर्चा झाल्या. मात्र या दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा ठामपणे निर्णय घेतला.

    दि. 27 डिसेंबर विवाहाचा मुहूर्त ठरला. लग्नाची तयारी सुरु झाली. अल्पवयीन मुलगा आणि तीन मुलांच्या आईच्या विवाहाची चर्चा गावात वार्‍यासारखी पसरली. घटनेची माहिती बाल संरक्षण कक्ष व पोलिसांना मिळाल्याने हा विवाह थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु झाला. विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच बाल संरक्षण कक्ष, जातपंचायत आणि पोलीस विभागाच्या सहकार्यातून हा विवाह थांबवण्यात आला. मात्र यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाल्याची माहिती तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय ठाकरे यांनी दिली.

    याबाबत अधिक माहिती देताना बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी अजय डबले म्हणाले की, “एका वयस्कर महिलेचा एका अल्पवयीन मुलासोबत विवाह होणार होता. संबंधित ठिकाणी पोहोचून तेथील कुटुंबीयांना सदर बाब कायद्याने गुन्हा आहे हे सांगितले तसेच गावातील ग्रामसभेत अशा प्रकारच्या घटना गावात होता कामा नये. ग्राम बाल संरक्षण समितीने जागरुक राहून काम करावे, याबद्दल सीमा भाकरे यांनी मार्गदर्शन केले.

    सदर दोन्ही कार्यवाही सुनील शिंगणे, विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास अमरावती विभाग अमरावती व डॉ. उमेश टेकाळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अमरावती यांनी केली.