‘ओमायक्रॉन’वर मात करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे : हसन मुश्रीफ

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून कोरोना धोका कमी झालेला नाही. पुढील काळात तिसऱ्या लाटेचा, ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

    अहमदनगर / नवराष्ट्र नेटवर्क न्यूज : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून कोरोना धोका कमी झालेला नाही. पुढील काळात तिसऱ्या लाटेचा, ओमायक्रॉनचा (Omicron) संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ओमायक्रॉनबाबत उपाययोजना व लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित उपस्थित होते.

    पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला अधिक गती देण्याची गरज असून, त्यासाठी प्रशासनाने  नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम पूर्ण करावी. कोरोनाच्या तपासणीमध्ये जिल्हा राज्यात सर्वात पुढे असून, रोज पाच हजारपेक्षा चाचण्या जिल्ह्यात होत आहे. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

    संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात औषधसाठा, बेडची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यात आजपर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात आत्तापर्यंत 308 नागरिक हे परदेशातून आले असून, सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात 97.90 टक्के एवढे असून, मृत्यूदर 1.99 टक्के इतका आहे. सध्या जिल्हयात 384 सक्रिय रुग्ण आहेत.

    जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, त्यापैकी 5 लाख नागरिकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, अशा लोकांचा प्रशासनाने शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ज्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणाची विशेष मोहिम राबवून नागरिकांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, अशा सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

    कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना आर्थिक मदत म्हणून 50 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत जिल्ह्यात 162 कोरोना मृतांच्या वारसांना मदत दिली गेली आहे. उर्वरित मृतांच्या वारसांना मदत लवकर कशी मिळेल, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.