गट ‘ड’ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेण्याची तयारी; राजेश टोपेंची घोषणा

कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणे आवश्यक होते. या सगळ्या जागा भराव्यात, अशी सरकारची भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडले ते नैतिकतेला धरून नव्हते, अशी कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत दिली.

    मुंबई : कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणे आवश्यक होते. या सगळ्या जागा भराव्यात, अशी सरकारची भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडले ते नैतिकतेला धरून नव्हते, अशी कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी विधान परिषदेत दिली.

    कुंपणाने शेत खाल्याची बाब समोर आल्याने त्यात दुरुस्ती आवश्यक आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणे चुकीचे नाही. जे लोक या प्रकरणी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही, असेही टोपे म्हणाले. दोषींना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही. या प्रकरणी न्यायाधीशांमार्फतही चौकशीची सरकारची तयारी असल्याचे सांगत त्यांनी विनामूल्य पुन्हा परीक्षा नव्या पध्दतीने घेण्याची तयारी असल्याचे सांगितले.

    गट ‘क’ आणि गट ‘ड’च्या घोटाळ्याची पोलीस चौकशी

    ते म्हणाले की, गट ‘क’ आणि गट ‘ड’च्या घोटाळा कामी पोलीस चौकशी करत आहेत. गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आहे. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत. पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असे राजेश टोपे म्हणाले. यावेळी भाजप सदस्य गोपीचंद पडळकर आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यानी आक्रमक पवित्रा घेतला. गट ‘क’साठी १५ लाख रुपये आणि गट ‘ड’साठी ८ लाख रुपयाचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये समोर आहे.

    अमरावतीमध्ये दोनशे विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत ही माहिती खरी आहे का? महेश बोटले हे सहसंचालक आहेत, त्यांचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार यासंदर्भात चौकशी करणार का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. दलालांची ऑडिओ क्लिप सायबरकडून तपासली जात आहे. तुमच्या सगळ्यांच समाधान करण्याची माझी जबाबदारी आहे. चौकशीत याची पाळंमुळे खोदून काढून दोषीवर कारवाई करु, असे राजेश टोपे म्हणाले.  ते म्हणाले की, याबाबत आरोग्य विभागाने स्वत: एफआयआर केलेला आहे. आमचा हेतू स्वच्छ होता, असे राजेश टोपे म्हणाले.

    एक पैसा न घेताही पुन्हा परीक्षा घेऊ

    यावेळी न्यासाला काम का दिले, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला. म्हाडा, आरोग्य भरती, टीईटी परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळले जात आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालणार नाही, असे प्रविण दरेकर म्हणाले.

    निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करु, असेही राजेश टोपे म्हणाले. न्यासा कंपनी न्यायालयात गेली होती. त्यानंतर न्यासाची निवड करण्यात आले. आपल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा नव्या परीक्षा पद्धतीने घेतली जाईल. गट ड ची परीक्षा पुन्हा घ्यायची असल्यास पुन्हा एक पैसा न घेताही घेऊ, असे राजेश टोपे म्हणाले.