‘सात वर्षांपूर्वीच तुमचा आवाज बंद केल्याचे भान राखा’; शंभूराज देसाईंचे सत्यजित पाटणकरांना प्रत्युत्तर

मंत्रिपदासाठी तेवढेच कर्तृत्व लागते आणि त्यासाठी जनतेत मिसळावे लागते. सर्वसामान्य जनतेची कामे तळमळीने करावी लागतात. त्याला कोणच्याही मेहरबानीची गरज लागत नाही. सत्यजितसिंह पाटणकर यांना उठता बसता माझ्या मंत्रिपदाची भीती का वाटते? मला माहीत नाही.

    पाटण : मंत्रिपदासाठी तेवढेच कर्तृत्व लागते आणि त्यासाठी जनतेत मिसळावे लागते. सर्वसामान्य जनतेची कामे तळमळीने करावी लागतात. त्याला कोणच्याही मेहरबानीची गरज लागत नाही. सत्यजितसिंह पाटणकर यांना उठता बसता माझ्या मंत्रिपदाची भीती का वाटते? मला माहीत नाही. मात्र, मला मंत्रिपद मेहरबानीवर मिळाल्याची भाषा करणारे सत्यजितसिंह आपल्यावर तर अनेक वर्षांपासून ज्या पक्षाची मेहरबानी आहे. मग त्या मेहरबानीवर आपण आमदार का बनू शकला नाही? तुमची निष्क्रियता ओळखूनच धनशक्तीच्या जोरावरील तुमची सत्तेची मस्ती उतरवत आपल्याला घरी बसवले. सात वर्षांपूर्वीच तुमचा आवाज बंद केल्याचे भान राखा, असे प्रत्युत्तर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिले.

    दौलतनगर ता. पाटण येथे पत्रकारांशी ते बोलत होते. शंभूराज देसाई म्हणाले, ज्यांनी आजपर्यंत वर्षानुवर्षे जिल्हा बँकेचे संचालकपद घेऊनही केवळ हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून पाटण तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केले आणि आता घराणेशाहीने पुन्हा त्याच पदावर मुलाला बसवून पुन्हा मागचे तेच पुढे होणार आहे. त्यामुळे आमच्या मंत्रिपदाची जास्त काळजी तुम्ही करण्याची गरज नाही.

    अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांना काय समजणार…

    मंत्रिपद हे पैशाचा माज दाखवून कधी मिळत नाही, ते मिळविण्यासाठी जनतेचे प्रेम, कर्तृत्व आणि पक्षावरील निष्ठा लागते आणि याची माहिती आपण आपल्या वडिलांकडून घेतली असतीतर अधिक बरे झाले असते. मात्र, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांना काय समजणार, असा उपरोधिक टोला देसाई यांनी लगावला.

    भविष्यातील सर्व निवडणुकांसाठी तयार

    राज्यातील आघाडी सरकार हे तिन्ही पक्षांचे सरकार आहे, हे केवळ एका पक्षाचे सरकार नाही. याचे भान ठेवून आपली वक्तव्ये करावीत आणि मगच कुणाच्या मेहरबानीवर कुणाला मंत्रिपदे मिळाली असली बेताल वक्तव्ये करावीत, असा इशारा देत देसाई म्हणाले, जिल्हा बँकेची केवळ १०२ मतदारांची निवडणूक जिंकली म्हणून आपण पाटण मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची निवडणूक जिंकली नाही. त्यामुळे आपला आत्ताच इतका थयथयाट बरा नाही. अजून बऱ्याच निवडणुका व्हायच्या आहेत. तालुक्यातील निवडणुका आमच्यासाठी काही नवीन नाहीत. आम्हीही या निवडणुकांमध्ये तुमच्याशी दोन हात करायला माझ्या कार्यकर्त्यांसह तयार असल्याचे शंभूराज देसाई स्पष्ट केले.