गावं पडणार ओस पण मराठवाडा झालाय सज्ज; जाणून घ्या वेळ अमावस्येबद्दल सविस्तर

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये वेळअमवस्या हा सण रुढी-परंपरा कायम ठेवत पार पडत आहे. त्यामुळे आज शहरात कमालीचा शुकशुकाट असणार तर शेत शिवारात नागरिकांची गर्दी आणि बच्चे कंपनीचा किलबिलाट राहणार आहे.

    लातूर : वेळ अमवस्या म्हणलं की शेतकऱ्यांसाठी काळ्या आईच्या पुजेचा सण या सणाला ग्रामीण भागात मोलाचे स्थान आहे. वेळ अमावस्या म्हणल की लहान, महिला, पुरुष सर्वासाठी एकत्र येऊन शेतशिवारात जाऊन आनंदात पांडवांची पूजा करून साजरा करण्याचा दिवस असतो. गेल्या दोन वर्षापासून या सणावर कोरोनाचे सावट होते. यंदा अद्यापही जिल्हा प्रशासनाने कोणतेही निर्बंध लादल्यामुळे दोन वर्षानंतर का होईना मोठ्या उत्सहात हा सण पार पाडला जाणार आहे.

    मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये हा सण रुढी-परंपरा कायम ठेवत पार पडत आहे. त्यामुळे आज शहरात कमालीचा शुकशुकाट असणार तर शेत शिवारात नागरिकांची गर्दी आणि बच्चे कंपनीचा किलबिलाट राहणार आहे.

    बैलपोळा आणि वेळअमावस्या हे सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे समजले जातात. बैलपोळया दिवशी ज्याच्या जिवावर शेती चालते, त्या बैलांची पुजा केली जाते, तसेच त्यांनी गोडधोडाचा नैवद्य देखील दाखवला जातो. तर वेळ अमावस्येदिवशी ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो त्या काळया आईची पुजा केली जाते.

    लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळ अमावस्यदिवशीची पुजा महत्त्वाची मानली जाते. या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेताततल्या लक्ष्मीची पुजा मांडली जाते. शेतात खरीप व रब्बी या दोन हंगामात मिळून वेळ अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पुजा केली जाते. मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात. यथासांग पुजा केली जाते. शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी प्रार्थना केली जाते.

    वेळ अमावस्या म्हणजे काय ?

    पेरणीनंतरची सातवी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या. जूनमध्ये पेरणी होते. सातवी अमावस्या डिसेबंर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते. तुरही ऐन बहरात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन सपुंर्ण शेती हिरवीगार झालेली असते. ऊनाची तीव्रता देखील नसते. वेळ अमावस्या साजरी करण्याची प्रथा कधी सुरू झाली असावी, याबाबतची निश्चित नोंद उपलब्ध नाही. वेळ अमावस्येच्या काळात लातूरसारख्या शहरी भागात तर कर्फ्यूसारखे वातावरण रस्त्यावर दिसते. आपल्यापेक्षा कोणीतरी अज्ञात शक्ती मोठी आहे. त्यासमोर वर्षातून एकदा तरी नतमस्तक व्हावे, याची शिकवणूक देणारी संस्कृती जोपासायची परंपरा यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

    नेमके काय असते दिवसभर? 

    शेतातील उत्पन्नाची सम्रद्धी भरमसाठ होण्याची मनोकामना व्हावी म्हणून मनोभावे काळ्या आईची पूजा असंख्य शेतकरी करतात. गत दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असल्याने शेतशिवार हिरवेगार झाल्याचे दिसून येत आहे. आमवस्येनिमित्त खाण्याची जणू मेजवानीच असते.

    आंबील, गव्हाची खीर, भज्जी, अंडे, धपाटे, शेंगा चटणी, वरण अशा विविध प्रकारचा मेनू असतो. त्यामुळे एरव्ही शेतीकडे बगल देणारी माणसे सगळीकडे हिरवेगार बागायत असल्याने शेतीची वारी करू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, परळी भागातील शेतकऱ्यांनी जोपासली आहे.

    काळजी घेण्याचे आवाहन

    वेळ अमावस्याच्या अनुशंगाने लातूर जिल्ह्यात दरवर्षी शासकीय सुट्टी दिली जाते. पण यंदा रविवारीच हा सण आला आहे. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. असे असताना हा एक सण आहे. त्यामुळे कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत पण 50 पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांनी केले आहे.