
आपल्या मनोरंजन क्षेत्राच्या काही वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, वर्षभरातील अनेक सणासुदीत विशेष रस घेणे. श्रीगणेशोत्सव तर फारच आवडता. चित्रपट, मालिका, वेबसीरिज तर झालेच पण प्रत्यक्षातही या सणाशी खास नाते.
९५१ च्या ‘श्रीगणेश जन्म’ या चित्रपटापासून अनेक गोष्टी सांगता येतील. ‘अन्नपूर्णा’ (१९६८) या चित्रपटात ‘तुझ्या कांतीसम’ हे श्री गणेश भक्तीचे गाणे आहे. सुलोचना दीदी गणपतीची पूजा करीत असताना हे गाणे गातात. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक जे. रावकवी यांनी आपल्या या चित्रपटाचे नाव ‘अन्न आणि अन्न’ असे ठेवून तो रिलीज केला, तेव्हा हे गाणे चित्रपटात काही रिळांनंतर होते. पण पुणे शहरात या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही म्हणून या चित्रपटाचे नाव ‘अन्नपूर्णा’ असे केले आणि हे गाणे चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला ठेवले. मग मुंबईत हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जणू गणपती पावला; चित्रपट सुपर हिट झाला. श्रीगणेशावरील भक्तीचा हा सकारात्मक प्रत्यय.
राजदत्त दिग्दर्शित ‘अष्टविनायक’ (१९७९) या लोकप्रिय चित्रपटात श्रीगणेशाची आरती आहे. हे गीत अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेश, जयवंत कुलकर्णी आणि पं. शरद जांभेकर यांनी गायले आहे. या गाण्यात अनुक्रमे मोरगाव (मयूरेश्वर), थेऊर (चिंतामणी), सिध्दटेक (सिद्धिविनायक), रांजणगाव (महागणपती), ओझर (विघ्नेश्वर), लेण्याद्री (गिरीजात्मक), महाड (वरदविनायक) आणि पाली (बल्लाळेश्वर) या अष्टविनायक स्थानांचे दर्शन घडते. सिनेमाच्या एकाच तिकीटात असा लाभ हे विशेष वैशिष्ट्यपूर्ण ठरले. गीतकार जगदीश खेबूडकर यांनी गणेशाच्या आठही स्थानांची वैशिष्ट्ये या गाण्यात गुंफली असून अनिल अरुण यांचे संगीत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात या चित्रपटातील चंद्रकांत, सचिन पिळगावकर, नवतारका वंदना पंडित, शरद तळवळकर, रमेश भाटकर हे कलाकार आहेतच; पण पाहुणे कलाकार म्हणून अनेक स्टारही आहेत. त्यात कृष्णकांत दळवी (गोंधळीच्या रुपात), सूर्यकांत (वासुदेव), अशोक सराफ (धनगर), उषा चव्हाण, आशा काळे, जयश्री गडकर (तिघीही नऊवारी साडी, पैठणीत), सुधीर दळवी, रवींद्र महाजनी (हे दोघेही शाहीराच्या वेषात कोल्हापुरी फेटा बांधून), आणि शाहू मोडक एकेका स्थानांचे वैशिष्ट्य गातात. कधीही हे गाणे पहावे आणि अष्टविनायकाचे दर्शन घडावे. चित्रपट असेही काही देत असतो.
सुषमा शिरोमणी अभिनित आणि निर्मित आणि दत्ता केशव दिग्दर्शित “फटाकडी” (१९८०) या चित्रपटातील ‘गणपतीच्या म्होरं सारं’ या गाण्यात सुषमा शिरोमणी, काजल किरण, भगवानदादा इतर अनेक जण नृत्य करताना दिसतात. सुषमाने याबाबत सांगितलेला किस्सा विशेषच. दादरच्या रुपतारा स्टुडिओत गणेश मूर्ती आणि मंडपाचा सेट उभारून या गाण्याचे शूटिंग करण्यात आले. पण शूटिंग संपल्यावर ही गणेश मूर्ती आणि मंडपाचा सेट बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता गणेश मूर्ती अजिबात हलेना. अगदी खूप प्रयत्न करुनही यश मिळेना. अखेर सुषमा शिरोमणीने निर्णय घेतला की अतिशय वाजतगाजत या श्री गणेश मूर्तीची मिरवणूक काढून दादर चौपाटीवर विसर्जन करुया. तेव्हा अनंत चतुर्थीचा दिवस नसूनही अशा पध्दतीने श्रीगणेशाला वाजत गाजत मिरवणूक काढून निरोप दिला आणि मग गणपतीच्या आशीर्वादाने हा चित्रपट सुपर हिट झाला.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मराठी चित्रपटात भूमिका साकारलीय तीदेखील अशाच गणेशभक्ती गीताने. दीपक सावंतनिर्मित ‘आक्का’ (१९९४) आणि या गाण्याचे बोल आहेत ‘तू जगती अधिपती’. या गाण्याचे शूटिंग गोरेगावच्या फिल्म सिटीतील देवळात झाले. तर हिंदी चित्रपटात नवरंग, हमसे बढकर कौन, दर्द का रिश्ता, अग्निपथ, इलाका, इत्यादीत गणेशोत्सव पाह्यला मिळतो. अभिनेता, निर्माता, संकलक आणि दिग्दर्शक राज कपूरने आर. के. फिल्म या बॅनरच्या स्थापनेनंतर १९४८ साली आर. के. स्टुडिओची भव्य ऐतिहासिक वास्तू उभारली आणि त्यात शूटिंगसाठीच्या भल्या मोठ्या फ्लोअरबरोबरच होळी आणि श्रीगणेशोत्सव असे दोन महत्वाचे सण आयोजित करण्यात सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात पृथ्वीराज कपूर या गणपतीची पूजा करीत, त्यांच्यानंतर राज कपूरने ही प्रथा पुढे नेली आणि मग राज कपूरनंतर रणधीर कपूरने पूजा करणे सुरु ठेवली. अनेकदातरी ऋषि कपूर या श्रीगणेशोत्सवात पूजेची सजावट करीत असे. कपूर कुटुंबिय आणि स्टुडिओतील कामगार असे दोघे मिळून हा श्रीगणेशोत्सव साजरा करीत. अनंत चतुर्थीच्या दिवशी याच गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीत हे कपूर कुटुंबिय सामील होऊन सायनपर्यंत चालत चालत येत. कालांतराने त्यात रणबीर कपूरही सामील होऊ लागला. न्यूज चॅनलच्या काळात ही गोष्ट लाईव्ह कव्हरेज ठरु लागली. ते अगदी स्वाभाविक होतेच. काही वर्षापूर्वी आर. के. स्टुडिओची विक्री झाली आणि हा गणेशोत्सवही खंडित झाला. जितेंद्र पूर्वी गिरगावातील रामचंद्र बिल्डिंगमध्ये (नंतरचे श्याम सदन) रहायला पण सेलिब्रिटीज झाल्यावर आणि गिरगाव सोडल्यावरही तो प्रत्येक वर्षी श्रीगणेश चतुर्थीला येथे येऊन गणपतीची मनोभावे पूजा करे. आता ती इमारत नूतनीकरणासाठी पाडलीय तरी या गणपतीची जितेंद्रला मनापासून आठवण आहे.
परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत आजही श्रीगणेशोत्सव साजरा केला जातो. चित्रपती व्ही. शांताराम यांनी आपल्या दिग्दर्शनातील ‘नवरंग’ या गीत संगीत व नृत्य यांची थीम असलेल्या भव्य चित्रपटासाठी श्रीगणेश मूर्ती उभारली होती. त्यावरचे शूटिंग संपले आणि व्ही. शांताराम यांनी निर्णय घेतला की याच मूर्तीपासून आपल्या स्टुडिओत प्रत्येक वर्षी श्रीगणेशोत्सव साजरा करायचा. ती प्रथा आजही सुरु आहे. तू सुखकर्ता, विश्वविनायक, विघ्नहर्ता महागणपती अशा मराठी चित्रपटांच्या “नावात” श्रीगणेश दिसला. माधुरी दीक्षितच्या घरी गणपती येतो आणि तिचे पती डाॅ. श्रीराम नेने, दोन्ही मुले त्याची मनोभावे पूजा करतात. श्रीगणेशोत्सवात उकडीचे मोदक आवडतात. शिल्पा शेट्टी, सोनाली बेन्द्रे अशा अनेक सेलिब्रिटीजच्या घरी गणपती येतो. सोशल मीडियात याचे फोटो भरपूर लाईक्स मिळवतात. विघ्नहर्ता महागणपती या चित्रपटात कोकणातील श्रीगणेशोत्सव परंपरा आहे. आमच्यासारखे आम्हीच, फटफजिती, धमाल बाबल्या गणप्याची, आई तुझा आशीर्वाद, उलाढाल या चित्रपटात गणेशभक्ती गीत पहायला मिळते.
ऐन गणेशोत्सवात पुण्यात मराठी चित्रपट प्रदर्शनाची परंपरा बरीच वर्षे कार्यरत होती. याचे कारण म्हणजे पुणे शहरातील सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या श्रीगणेश मूर्ती आणि भव्य रोषणाई, देखावे पाहण्यासाठी अन्य अनेक ठिकाणांहून अगणित भक्त येण्याची दीर्घकालीन परंपरा आहे. आणि हे सगळे पहायचे तर रात्री, तर मग दिवसा काय करायचं? तर वेळ सार्थकी लावण्यासाठी मराठी चित्रपट पाह्यला प्राधान्य दिले जाई आणि त्यामुळे बारा, तीन आणि सहा या वाजताचे शो हाऊस फुल्ल गर्दीत चालत. एकदा का अशा चित्रपटाचा बाॅक्स ऑफिसवर जम बसला की मग श्रीगणेशोत्सवानंतरही या मराठी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत राही आणि तेच तर महत्वाचे आहे ना? आपली चित्रपट प्रेक्षक संस्कृती काही वेगळीच आहे. त्यातील हे एक वैशिष्ट्य.
श्रीगणेशोत्सवातील एकेकाळचा सर्वात मोठा फंडा म्हणजे, पूर्वी ‘गल्ली चित्रपट’ ही लोकप्रिय गोष्ट ! मुंबईत तर एकेका मंडळाच्या वतीने तीन हिंदी आणि एका मराठी चित्रपटाचे आयोजन आवर्जून केले जाई. मराठी चित्रपटात चंद्रकांत, सूर्यकांत, राजा गोसावी, अरुण सरनाईक, दादा कोंडके यांच्या अनेक जुन्या चित्रपटांना प्रचंड मागणी असे. जगाच्या पाठीवर, सांगत्ये ऐका, पाठलाग, आम्ही जातो आमच्या गावा, दाम करी काम, बाळा गाऊ कशी अंगाई, सतीचं वाण, लक्ष्मण रेषा, वारणेचा वाघ, पाठचा भाऊ, पवनकाठचा धोंडी, सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा अशा चित्रपटांना मागणी असे. तर हिंदी चित्रपटात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, शम्मी कपूर, धर्मेंद्र, राजेश खन्ना, जितेन्द्र या स्टार्सच्या अनेक चित्रपटांना खूपच चांगली मागणी असे. मंडपात पडदा लावून हे चित्रपट छोट्या प्रोजेक्शनने दाखवले जात. यात रिळे बदलावी लागत म्हणून एका अधिकृत मध्यंतरसह आणखीन दोन, अशी एकूण तीन मध्यंतर असत. अगदी अनेकदा तरी मध्ये फिल्मही तुटायची. पण तरीही कोणी तक्रार करत नसत. महत्वाचे म्हणजे रात्री दहानंतर हे चित्रपट सुरु होऊन साडेबारानंतर संपत. पण त्याबद्दल काही नियम वगैरे नव्हते. खरं तर या भन्नाट संस्कृतीवर आधारित एकादा माहितीपट (डाॅक्युमेंटरी) निर्माण झाल्यास जगभरातील प्रेक्षकांपर्यंत त्याची महती व माहिती पोहचेल. हे जपले पाहिजे.
अनेक कलाकार श्रीगणेशोत्सवतील मेळे, लोकनाट्य, लोकनृत्य, वाद्यवृंद्य यातून घडलेत, पुढे आलेत. विशेषत: फार पूर्वी गिरगाव, गिरणगावात लहानाचे मोठे झालेल्या अनेकांची पाळेमुळे या श्रीगणेशोत्सवात रुजलीत, घट्ट झालीत. पूर्वी श्रीगणेशोत्सवात राज्यात अनेक ठिकाणी नाटक, वाद्यवृंद्य यांचे दौरे होत आणि कलाकार आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचत. आता पुण्यात सौरभ गोखले, श्रृती मराठे, अनुजा साठे असे अनेक कलाकार गणेश आगमन आणि विसर्जन अशा दोन्हीच्या भव्य दिमाखदार मिरवणुकीत ढोल ताशे वादनाचा आनंद घेतात. त्यातील त्यांचा सहभाग उल्लेखनीय असतो. कलाकारांच्या घरचा गणपती, सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाला सेलिब्रिटीजची भेट, विशेषत: ‘लालबागचा राजा’चे आवर्जून दर्शन घ्यावे असे अनेक सेलिब्रिटीजना मनोमन वाटते आणि मग त्याचे लाईव्ह कव्हरेजही होते. गौरी पूजन, अनंत चतुर्थी मिरवणुकीत सहभाग असा हा गणेशोत्सव व चित्रपट नात्याचा विषय रंगत चाललाय.
– दिलीप ठाकूर