
जी-२० च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ , भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन (Experience Zone) बैठकीच्या मांडले जाणार आहे.
मुंबई : भारताच्या (India) जी-२० (G20) अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील जी-२० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची पहिली बैठक (First meeting of the Trade and Investment Working Group) उद्या म्हणजेच, येत्या २८ ते ३० मार्च २०२३ दरम्यान, मुंबईत (Mumbai) होणार आहे.
या तीन दिवसीय बैठकीत जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देण्याविषयक चर्चेत, जी-२० सदस्य गटांचे १०० हून अधिक प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी, प्रादेशिक समूहांचे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी, ५० पेक्षा अधिक प्रतिनिधी आज मुंबईत पोहोचले आहेत.
बैठकीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे २८ मार्च रोजी, ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य’ या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. व्यापार आणि वित्तपुरवठा यातील तफावत कमी करण्यासाठी, बँका, वित्तीय संस्था, विकास वित्तीय संस्था आणि निर्यात पतसंस्था यांची भूमिका, तसेच, डिजिटलीकरण आणि फीनटेक सोल्यूशन याद्वारे, व्यापारविषयक वित्तपुरवठ्याचे सहाय अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल, यावर या परिषदेतील दोन सत्रात सविस्तर चर्चा होईल. भारतातील तसेच, परदेशातील या क्षेत्रात नामवंत तज्ञांना या बैठकीत विचार मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
परिषदेसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना त्यानंतर भारत डायमंड बोर्स या मुंबईतील हिरे व्यापार केंद्राची सफर घडविली जाईल.
जी-२० च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ , भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन (Experience Zone) बैठकीच्या मांडले जाणार आहे. त्या बरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले जाणार आहे.
२९ मार्च रोजी, जी-२० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकीचे औपचारिक उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड यांच्या हस्ते होईल. जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रम, ज्याचा भारत जी २० चा अध्यक्ष या नात्याने पाठपुरावा करत आहे, त्यासंदर्भातील चार तंत्रज्ञानविषयक सत्रांमध्ये २९ आणि ३० मार्च रोजी चर्चा केली जाईल.
२९ मार्च रोजीच्या सत्रात, विकास आणि समृद्धीसाठी व्यापाराला चालना आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी निर्माण करण्यावर चर्चेचा प्रामुख्याने भर असेल.
तसेच समावेशक आणि लवचिक विकासासाठी, जागतिक मूल्य साखळीत विकसनशील देशांचा आणि ग्लोबल साउथचा सहभाग वाढवण्यासाठी आणि भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी लवचिक जागतिक मूल्य साखळी तयार करण्यासाठी सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यावर भर दिला जाईल.
३० मार्च रोजी आयोजित, बैठकीच्या दोन सत्रांमध्ये, जागतिक व्यापारात एमएसएमईचे एकात्मीकरण तसेच व्यापारासाठी कार्यक्षम लॉजिस्टिक व्यवस्था उभारण्याला प्राधान्य अशी दोन सत्रात चर्चा केली जाईल. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांमधील उपजीविका टिकवून ठेवण्याला प्राधान्य देणे आणि जागतिक व्यापारात एमएसएमईचे एकात्मीकरण यांना यापूर्वी जी २० अध्यक्ष असलेल्या देशांनी केलेले कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा भारताचा मानस आहे. विविध देशांच्या सीमांदरम्यान आणि देशांतर्गत दुर्गम भागात वाहतुकीवरील खर्च कमी होऊ शकेल अशी मजबूत लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या उपायांवर देखील जी २० प्रतिनिधी चर्चा करतील .
जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देताना उदभवणारी आव्हाने आणि मानव-केंद्रित ठोस निष्कर्ष आणि धोरणे आखण्यासाठी विद्यमान संधींचा कसा उपयोग करता येऊ शकतो याबाबत सामायिक समज निर्माण करणे हे भारताच्या जी २० अध्यक्षतेचे उद्दिष्ट आहे.