नियमित कर्ज भरणाऱ्यांची दिशाभूल; शेतकऱ्यांना ५० हजारांचा परतीचा हप्ता अप्राप्त

राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे उचल केलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे.

    ब्रम्हपुरी (Brahmapuri).  राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे उचल केलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची सानुग्रह राशी परतफेड केली जाईल असे शासनाने सांगितले होते.

    आजतागायत शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा परतीचा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा परतीचा हप्ता त्वरित द्यावा अशी मागणी जिप. माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी केली आहे.
    राज्य सरकारने 2020 मध्ये कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सलग तीन वर्षे कर्जाची मुदतीपूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची सानुग्रह राशीची परतफेड करू असे राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात आश्वासन दिले होते.

    परंतु सध्याच्या परिस्थितीतवरील आश्वासन हवेतच विरले असून सध्या आर्थिक वर्षे संपले तरीसुद्धा नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या सानुग्रह राशीची परतफेड देण्यात आली नाही. सध्याच्या परिस्थितीत ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी कोरोना, महापूर, अवकाळी या नैसर्गिक आपत्तीने बेजार झाला असतांनाच महावितरण कंपनीने वीजवसुलीचा तगादा लावला त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे, अशा अवस्थेत त्वरीत 50 हजार रुपयांची सानुग्रह राशी शासनाने ताबडतोब द्यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी केली आहे.