मजुरांचा प्रतिबंधात्मक नियमांना हरताळ; कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी

राज्यात कोरानोचा वाढता प्रादुर्भाव बघता खडक निर्बंधासोबतचं दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला परंतु दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील काही उद्योगांकडून शासनाच्या निर्देशांची पायमल्ली केल्या जात असल्याचे चित्र समोर येत आहे, ही बाब प्रशासनाने गांभिर्याने घेणे गरजेचे आहे.

    चंद्रपूर (Chandrapur).  राज्यात कोरानोचा वाढता प्रादुर्भाव बघता खडक निर्बंधासोबतचं दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला परंतु दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील काही उद्योगांकडून शासनाच्या निर्देशांची पायमल्ली केल्या जात असल्याचे चित्र समोर येत आहे, ही बाब प्रशासनाने गांभिर्याने घेणे गरजेचे आहे.

    जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील आर्यन कोल वॉशरीजमध्ये कोळशाची वाहतूक करण्यासाठी परराज्यातून रोज 150 च्या वर ट्रक जिल्ह्यात येतात. या ट्रकचे चालक वाहक तसेच काम करणारे मजूर कोरोना नियमांचे पालन करीत नसून हे सर्व लोक विनामास्क बिनधास्तपणे परिसरात फिरत असतात. आम्ही शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत असून कर्मचाऱ्यांना कंपनी परिसरात मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला हात सॅनिटाईज करण्यास सांगितल्या जाते आणि सामाजिक अंतराचे पालन केल्या जात असल्याची भूमिका कोलवॉशरीज प्रशासनाने घेतली आहे.

    औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध जिल्ह्यात काळ्या सोन्याच्या खाणी सर्वत्र आहेत. अर्थात उद्योगांना वीज निर्मिती तसेच इतर कामांसाठी कोळशाची गरज असते. खाणीतून निघणारा कोळसा माती मिश्रित असतो त्यामुळे हा कोळसा स्वच्छ करणे गरजेचे असल्यामुळे स्वाभाविकपणे जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी कोल वॉशरीज सुरू झाल्या.

    राजुरा तालुक्यातही अनेक कोळसा खाणी असल्यामुळे स्वाभाविकपणे तालुक्यातही कोल वॉशरीजचा उद्योग फोफावला असुन तालुक्यातील पांढरपोवणी गावालगत कोल वॉशरीज कार्यरत आहेत. परंतु गावालगत असलेल्या आर्यन कोल वॉशरीज या उद्योगात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर गावांत कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती असल्याचे गावकऱ्यांनी राजुरा तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

    दररोज 150 ते 200 ट्रक परप्रांतातून कंपनीत येत असल्याने येथे काम करणारे कामगार व लगतच्या पांढरपोवनी गावाला कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला असून यावर आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या ट्रक चालक तसेच वाहकाची कोरोना प्रतिबंधात्मक चाचणी झाली आहे अथवा नाही याची कोणतीही खातरजमा कंपनीद्वारे केल्या जात नसुन परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे 72 तासापूर्वी घेतलेला कोरोना चाचणी अहवाल असणे बंधनकारक असुनही कंपनी चालक वाहकाची चाचणी झाली अथवा नाही याची कुठलीही शहानिशा करत नसल्याची माहिती आहे.

    विनामास्कधारी चालक-वाहकांची अरेरावी
    हे चालक वाहक बरेचदा गरजेच्या वस्तू घेण्यासाठी गावातील दुकानात येतात. मात्र, ते मास्क लावत नाही आणि कुणी त्यांना हटकले तर उलट अरेरावी करतात. यांच्या अशा वागण्यामुळे अर्थात गावांत कोरोना संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही आणि असे काही घडल्यास आर्यन कोल वॉशरीज याची जबाबदारी घेणार का? असा संतप्त सवाल गावकऱ्यांच्या वतीने संदिप गायकवाड यांनी आहे. याबाबत तहसीलदार राजुरा यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

    प्रवासी कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करा
    याशिवाय कोल वॉशरीमध्ये कार्यरत कर्मचारी इतर ठिकाणाहून जाणे येणे करीत असल्याने त्यांचीसुद्धा चाचणी असतानाही असे जात नसल्याचे समजते. त्यामुळे एकतर कोल वॉशरी व्यवस्थापनाने प्रवासी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आपल्या परिसरात करावी किंवा कर्मचाऱ्यांची नियमित चाचणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.