अखेर स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी; लवकरच बनणार पक्का रस्ता

गोंडपिपरी तालुक्यातील चेकघडोली येथील स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग अतिक्रमणाने गिंळकृत झाला होता. गावात दुर्देवी घटनेत एखादयाचा मृत्यू झाल्यास अंतीम संस्कारासाठी मोठीच अडचण निर्माण व्हायची.

    गोंडपिपरी (Gondpipri).  तालुक्यातील चेकघडोली येथील स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग अतिक्रमणाने गिंळकृत झाला होता. गावात दुर्देवी घटनेत एखादयाचा मृत्यू झाल्यास अंतीम संस्कारासाठी मोठीच अडचण निर्माण व्हायची. त्या त्या वेळी नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जायचा. गेल्या चाळीस वर्षांपासून ही महत्त्वाची समस्या गावकऱ्यांना भेडसावत होती.

    दरम्यान पोचमल्लू उलेंदला यांनी सरपंचपदाची सुत्र हाती घेताच अतिक्रमीत शेतकरी व प्रशासनाशी समन्वय साधून समस्या निकाली काढली. यामुळे तब्बल चाळीस वर्षापासून प्रंलबित असणारी समस्या सुटली असून या मार्गावर पक्का रस्ताही मंजूर करण्यात आला आहे.

    गोंडपिपरी तालुक्यातील चेकघडोली येथील स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग अतिक्रमणामुळे गिळंकृत झाला होता. गावातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीकडे जाण्यास मोठीच अडचण होती. गावातील हि समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपूरावा केला. निवेदन दिली. पण, त्याचा काही एक फायदा झाला नाही. मार्गाच्या दोन्ही बाजूकडील शेतकरी काही एक मानायला तयार नसल्याने तब्बल चाळीस वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. दरम्यान नुकतीच गावात ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. सामाजिक कार्यकर्ते पोचमल्लू उलेंदंला यांची सरपंचपदी निवड झाली.

    आपल्या पदाचा भार स्वीकारताच त्यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून असलेली समस्या सोडविण्याचा चंग बांधला. तहसीलदार के.डी.मेश्राम, ठाणेदार संदीप धोबे यांची त्यांनी भेट घेऊन या समस्येबाबत चर्चा केली. गावातील स्मशानभूमीच्या मार्गावर ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले. त्यांना कार्यालयात बोलावून घेतले. त्या संपूर्ण शेतकऱ्यांशी त्यांनी समन्वय साधला. शेवटी उलेंदला यांच्या अथक परिश्रमानंतर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या आठ मिटरचा मार्ग मोकळा करण्यात आला. यावेळी गावातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. भुमी अभिलेख विभागाचे कर्मचारी, सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारीही उपस्थित होते.