केरळ ट्रेन अग्निकांडाचा दहशतवादाशी संबंध? युपीच्या बुलंदशहरमध्ये संशयिताची चौकशी, NIA टीम दाखल

केरळमधील कोझिकोडमध्ये रेल्वेच्या बोगीमध्ये ज्वलनशील पदार्थ शिंपडून सहप्रवाशांना आग लावल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे संशयिताला केरळमधून नाही तर उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

    केरळ ट्रेनला (Kerala Burning Train) लागलेल्या आगीची (Fire) झळ उत्तर प्रदेशात पोहोचली आहे. युपी एटीएसने (UP ATS) याप्रकरणी शाहरुख सैफी (Shah Rukh Saifi) नावाच्या संशयिताची बुलंदशहर (Bulandshahr) येथून ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले आहे. युपी एटीएसने शाहरुखला बुलंदशहरच्या सायना कोतवालीच्या (Saina Kotwali) अकबराबाद (Akbarabad) येथून पकडले.

    रेल्वे अग्निकांडात शाहरुखचा हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. युपी एटीएस स्केचच्या माध्यमातून शाहरुखपर्यंत पोहोचली होती. एटीएसच्या एडीजीनुसार शाहरुखची संशयाच्या आधारे चौकशी करण्यात आली आहे.

    शाहरुखला चार भाऊ आहेत. दोन भाऊ गाझियाबादमध्ये तर दोन भाऊ बुलंदशहरमध्ये राहतात. नववी पास शाहरुख हा व्यवसायाने सुतार आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दहशतवादी दृष्टीकोन देखील नाकारला नाही, म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक केरळमधील कन्नूरला पोहोचले आहे.

    खरं तर, ३ एप्रिल रोजी केरळमधील कोझिकोडमध्ये चालत्या ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ शिंपडून प्रवाशांना आग लावण्याचे प्रकरण समोर आले होते. सीटवर बसण्यावरून आरोपीचा सहप्रवाशांशी वाद झाला, त्यानंतर त्याने केमिकलने भरलेली बाटली फेकून पेटवून दिली.

    बोगीला अचानक आग लागल्याचे पाहून एका वर्षाच्या चिमुकल्यासह प्रवास करणाऱ्या महिलेने चालत्या ट्रेनमधूनच उडी मारली होती. त्यांच्याशिवाय पोलिसांना नंतर रुळांवरून आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. या जाळपोळीत ट्रेनमधील ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    रविवारी रात्री ९.४५ वाजता अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर ट्रेन कोरापुझा रेल्वे पुलावर पोहोचली. एका व्यक्तीने इतर प्रवाशांना ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले होते. या आगीत ९ जण गंभीररीत्या भाजले. घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाला होता.

    ट्रेनमध्ये सापडला महिलेचा मोबाईल

    ट्रेनच्या बोगीला लागलेली आग पाहून इतर प्रवाशांनी चेन ओढून जखमींना रुग्णालयात नेले. येथून पुढे निघून ट्रेन कन्नूरला पोहोचली तेव्हा काही प्रवाशांनी या घटनेनंतर एक महिला आणि एक मूल बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.

    मुलासह महिलेला ट्रेनमधून फेकले!

    जाळपोळीत जखमी झालेल्या व्यक्तीचा दोघांचा शोध सुरू होता. बरीच शोधाशोध केल्यानंतर ट्रेनमधून महिलेचा मोबाईल आणि मुलाचा बूट सापडला. पोलिसांनी महिलेचा व मुलाचा शोध सुरू केला असता, महिला व बालक व्यतिरिक्त अन्य एका व्यक्तीचा मृतदेह एलाथूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावर पडलेला आढळून आला. आग लागल्याचे पाहून त्याने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याचा पोलिसांना संशय आहे.

    वडीलही म्हणाले- ATS चौकशी करून निघून गेली

    शाहरुखचे वडील यामीन सैफी यांचा दावा आहे की, एटीएसने शाहरुखला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर घरी पाठवले होते. शाहरुखसोबत त्याचा भाऊ आसिफ असून दोघेही घरी परतत आहेत. शाहरुख कधीच केरळला गेला नसल्याचा यासिनचा दावा आहे. तो गेल्या दोन महिन्यांपासून सियानामध्ये असून दिल्ली-एनसीआरमध्ये काम करतो. चार भावांव्यतिरिक्त शाहरुखला ६ बहिणीही आहेत. शाहरुखचे सर्व भाऊ सुतार आहेत.