हुंड्यासाठी विवाहितेचा खून करून अपघाताचा बनाव 

हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा खून केला. त्यानंतर खुनाचा सुगावा न लागण्यासाठी अपघाताचा बनाव केला. हा प्रकार २६ मार्च रोजी कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडला.

    पिंपरी :  हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा खून केला. त्यानंतर खुनाचा सुगावा न लागण्यासाठी अपघाताचा बनाव केला. हा प्रकार २६ मार्च रोजी कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडला.
    अंजली अंकित शर्मा (वय ३०, रा. कासारवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे वडील ईश्वरचंद जगदीशचंद (वय ४५) यांनी बुधवारी (दि. ११ ) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अंकित राजेश शर्मा, सासरे राजेश शर्मा, सासू आणि दिर (सर्व रा. कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अंजली आणि आरोपी अंकित यांचा विवाह झाला. त्यानंतर अंकित आणि त्याच्या घरच्यांनी अंजलीकडे हुंड्याची मागणी केली. त्यावरून कटकारस्थान व षडयंत्र रचून आरोपींनी अंजलीला पुण्यात नेले. तिथे तिची हत्या केली. या हत्येचा सुगावा लागू नये यासाठी अपघात झाल्याचा बनाव केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.