
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसाचाराचे गालबोट लागले. या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारात ८३ जवानांसह ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार गुन्हे दाखल झाले असून, आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसाचाराचे गालबोट लागले. या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारात ८३ जवानांसह ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार गुन्हे दाखल झाले असून, आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी संपत्तीचं नुकसान आणि कोरोना गाइडलाइन्सचं उल्लंघन करणे आणि NOC च्या नियमांची अवहेलना करणे आदी गुन्ह्यांच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय नुकसान पोहोचविणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या तोडफोडप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आठ बस आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
हिंसाचार आणि आंदोलनाला लागलेल्या गालबोटानंतर प्रजासत्ताकदिनी दिल्लीत काढण्यात आलेली ट्रॅक्टर परेड मागे घेण्याचा निर्णय संयुक्त किमान मोर्चाने घेतला आहे. तसेच या परेडमध्ये सामिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या निश्चित आंदोलनस्थळी परतण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.