कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रम कमी होणार : प्रा. वर्षा गायकवाड

कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात येत आहे.

मुंबई : कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ % अभ्यासक्रम कमी करण्यात येत आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 

१०१ विषयांचा २५ टक्के पाठ्यक्रम कमी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती ) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( बोर्ड ) यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील २२, माध्यमिक स्तरावरील २० आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ असे एकूण १०१ विषयांचा इयत्ता निहाय , विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात येत असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

असा आहे निर्णय

पाठ्यक्रमातून २५ % भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जावू नयेत .

१) भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत .

२) इतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे .

३) शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम / प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे .

४) प्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन – अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे .

५) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. त्या दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे.    

६) इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय , विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे .

७) शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेऊन त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.