मुंबई : सध्या सुरू असलेल्या साथीच्या काळात, ‘लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ने (एलटीपीटी) विविध राज्यांमधील ग्रामीण भागातील २३ हजार वंचित मुलांना ‘विद्या’ (vidya) या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण (education) दिले व त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही, याची दक्षता घेतली.
‘कोरोना’च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर भारतातील शालेय शिक्षणाची यंत्रणा डिजिटल स्वरुपात दुभंगली असताना, ‘लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ने ‘सॅप इंडिया’च्या ‘’कोड उन्नती’’ उपक्रमासोबत भागीदारीतून ‘’विद्या’’ हा उपक्रम राबविला. हा उपक्रम कॉर्पोरेट क्षेत्राकडून नागरिकांकरीता राबविण्यात येणारा, डिजिटल साक्षरतेस चालना देणारा आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्ये विकसीत करणारा आहे. समुदायांना, विशेषतः मुलांच्या पालकांना यात सहभागी करून घेण्यात येते. ‘प्रथम एज्युकेशन फाउंडेशन’ आणि ‘अगस्त्य फाउंडेशन’ या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या दोन प्रमुख स्वयंसेवी संस्थांनी याकामी ‘एलटीपीसीटी’शी हातमिळवणी केली व ‘कोरोना’च्या काळातही या सर्वांनी मिळून डिजिटल शैक्षणिक उपक्रम आणि विज्ञान शिक्षण कार्यक्रम आयोजित केले.
जागतिक महामारी दरम्यान अनेक कंपन्यांनी आपली सामाजिक जबाबदारी स्वत:चे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि आसपासच्या समुदायापुरती मर्यादीत ठेवली. परंतु ‘लार्सन अँड टुब्रो’च्या सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टने (एलटीपीसीटी) आपले काम समाजातील वंचित घटकांपर्यंत नेले आणि आपल्या वचनबद्धतेचे पालन केले.
प्रवक्ता, एल अँड टी
‘विद्या’ या उपक्रमातर्फे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तलासरी या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ग्रीष्मकालीन शिबिरे, विशेष रेडिओ कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गुजरातमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील अहमदनगर, तळेगाव, तलासरी; गुजरातमधील खरेल, नवसारी, हाजीरा, सूरत, वडोदरा; आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम; हरियाणामधील फरीदाबाद तसेच तामिळनाडूतील कोईमतूर येथे विज्ञानविषयक नाविन्यपूर्ण प्रकल्प घेण्यात आले. ‘एलटीपीसीटी’ने गुजरातमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात आयोजित केला आहे.
तलासरीमध्ये विद्या प्रकल्पात मुलांच्या पालकांना सहभागी करून घेण्यात आले. या मॉडेलमध्ये ‘क्लस्टर रिसोर्स पर्सन्स’ (सीआरपी) आणि संचारक यांची नेमणूक करण्यात येते. या पदांसाठी मुलांची आई किंवा त्याच समाजातील तरुण पदवीधर यांना नेमण्यात येते. त्यांना बालसाहित्य, पालकत्व, समुपदेशन आणि डिजिटल शिक्षण यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना त्या परिसरातील इतर कुटुंबे वाटून दिली जातात व त्या कुटुंबांशी दूरध्वनीवरून वा प्रत्यक्ष भेटीतून संपर्क साधण्यास सांगितले जाते. सध्या ही अशी शिक्षण सत्रे मोबाईल कॉल व व्हॉट्सअॅपवरुन घेतली जात आहेत.
“रचना आणि योजना आखल्या जात असताना, ग्रामीण आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या समुदायातील मुलांसाठी पालकांचा सहभाग आणि त्यांची देखरेख या गोष्टींची थोडी जास्त गरज असते. पालकांच्या सल्ल्यामुळे मुले स्व-अभ्यास करण्यास, नवीन छंद विकसित करण्यास, कोणत्याही गोष्टींचा बारकाईने विचार करण्यास आणि कोरोना संकटाच्या काळात शिकण्याचे महत्त्व जाणण्यास प्रोत्साहित होतात,’’ असे या प्रवक्त्याने म्हटले.
‘सीआरपी’ व संचारक यांनी ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’च्या माध्यमातून विद्यार्थी आणि स्थानिक समुदायाशी संपर्क साधला आणि डिजिटल स्वरुपात ग्रीष्मकालीन शिबिरे घेतली. दररोज सकाळी ‘सीआरपी’तर्फे विद्यार्थ्यांना ‘व्हॉट्सअॅप ग्रूप’मधून कार्ये दिली जात आणि हे विद्यार्थी दिवसअखेरीस त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल ग्रूपवर शेअर करीत. या ऑनलाइन ग्रीष्मकालीन शिबिरांमध्ये सुरुवातीला हस्तकला उपक्रम आणि साधे विज्ञान प्रयोगही आयोजित केले गेले.
गुजरातमध्ये त्यांनी ७ तालुक्यांमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आणि ७००हून अधिक शिक्षकांपर्यंत तो पोहोचवला. या राज्यात, ‘एलटीपीसीटी’ने विद्याच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्युत चुंबकत्व, मानवी मेंदूची गुंतागुंत, रासायनिक समीकरणांचे प्रकार इत्यादी विषयांचे स्पष्टीकरण देण्यासाठी व्हिडिओ तयार केले. त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग घेतले.
याव्यतिरिक्त, अहमदनगरमधील ‘एलटीपीसीटी’ने अनेक वैज्ञानिकांच्या जीवनातील रोमांचक कथा तयार केल्या आणि वंचित विद्यार्थ्यांना त्या ऐकवल्या. ‘युनिसेफ’ आणि ‘डिझाइन फॉर चेंज’ यांनी आयोजित केलेल्या ‘यूथ चॅलेंज’मध्ये अहमदनगर आणि तळेगाव संघांनीही भाग घेतला. कोईमतूरमध्ये ‘विद्या’च्या संघाने फेसमास्क बनविणे, हात धुण्याचे तंत्र यांसारखे ‘कोविड’पासून सुरक्षिततेचे व खबरदारीचे कार्यक्रम राबवले. त्या परिसरातील रहिवाशांसाठी व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रमही घेण्यात आले.