आलिया भट्टला दिलासा, दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेल्या समन्सला मिळाली स्थगिती

याआधीच न्यायालयाने या पुस्तकावर आधारित 'गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे निर्माते भन्साळी आणि अभिनेत्री आलिया भट्टला बजावलेल्या समन्सपासून दिलासा दिला आहे

    ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ज्या कादंबरीवर बेतलेला आहे. त्या कादंबरीच्या लेखकिंविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीवर दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लेखकांना दिलासा मिळाला आहे.

    गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. त्या पुस्तकातील काही भाग बदनामीकारक असून गगुबांईंची प्रतिष्ठा डागाळली आहे. त्यामुळे गंगुबाईंच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. असे सांगत गंगुबाई काठियावाडी यांचा दत्तक मुलगा बाबूजी रावजी शहा यांनी मुंबईतील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे या पुस्तकाच्या लेखक हुसैन जैदी यांच्या विरोधात मानहानीचा फौजदारी दावा केला आहे. त्याची दखल घेत महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना समन्स जारी केले होते. त्याला हुसैन जैदी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, सदर पुस्तक एप्रिल २०११ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते तर दंडाधिकाऱ्याकडे तक्रार फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल करण्यात आल्याचे लेखकांच्या बाजूने अँड. गुंजन मंगला यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

    तसेच मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’च्या लेखकांना कादंबरीच्या प्रकाशन, विक्री किंवा पुस्तकावर हक्क निर्माण करण्यापासून कायमस्वरुपी रोखण्यात यावे, अशी मागणी करणारा खटला फेटाळून लावल्याची बाबही अँड. गुंजन मंगला यांनी न्यायालयाला सांगितली. त्याची दखल घेत न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावत लेखकांना बजावण्यात आलेल्या समन्सला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देत सुनावणी ६ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

    याआधीच न्यायालयाने या पुस्तकावर आधारित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे निर्माते भन्साळी आणि अभिनेत्री आलिया भट्टला बजावलेल्या समन्सपासून दिलासा दिला आहे