दोन विरुद्ध विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या अंतरा आणि मल्हारची गोष्ट,’जीव माझा गुंतला’!

मालिकेद्वारे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुभवी कलाकारांचा संच, अनोखी कथा, वैशिष्टयपूर्ण चित्रीकरण स्थळं यामुळे आम्ही आशा करतो की मालिका प्रेक्षकांना आवडेल.

    आपण सगळेच आयुष्यात एका गोष्टीला खूप जपतो आणि ती म्हणजे नाती. घराचा पाया याच नात्यांनी आणि त्यामधील विश्वासाने मजबूत होतो. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा देखील अगदीच अशीच आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नात्यांचा गुंता आणि पराकोटीचा द्वेष यामध्ये या दोघांचं नातं कुठलं वळण घेईल हे अनुभवणं रंजक असणार आहे.

    मालिकेबद्दल बोलताना, मराठी टेलिविजन प्रमुख, (वायाकॉम18) दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “आपण सगळे जवळपास दीड वर्ष भीषण अशा महामारीशी लढतो आहे. ह्या संकटकाळी खरी परीक्षा आहे ती आपल्यातील नाते संबंधांची. नात्यांची विविध रूपं या काळात आपण अनुभवली. अशा वेळी आमची जबाबदारी विशेष वाढते. कारण मनोरंजन हे अत्यंत सशक्त माध्यम आहे. काही क्षणांचा विरंगुळा मनाला उभारी देतो. नात्यांच्या विविध पैलूंवर विचार करून आणि नात्यातील अनोखी बाजू मनोरंजनातून आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतोच. ग्रामीण महाराष्ट्राच्या पाश्वर्भूमीवर आधारित ‘जीव माझा गुंतला’ मालिका एका सुंदर नात्याची वीण घालणार आहे. या मालिकेची मांडणी आणि चित्रीकरणामुळे प्रेक्षकांना ती नक्कीच आपलीशी वाटेल. मालिकेद्वारे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुभवी कलाकारांचा संच, अनोखी कथा, वैशिष्टयपूर्ण चित्रीकरण स्थळं यामुळे आम्ही आशा करतो की मालिका प्रेक्षकांना आवडेल. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या निमित्ताने एक्सटेंडेड प्राईमटाईम बॅंड मजबूत होईल याची आम्हांला खात्री आहे”.

    मालिकेचे लेखक जिंतेंद्र गुप्ता म्हणाले, “जगाभरातली कोणतीही लोकप्रिय कथा असो मग ते महाभारत असो किंवा कोणत्याही स्वरूपात लिहिली गेलेली कथा. प्रत्येक कथेला वेगळेपण त्या कथेतली पात्रं देतात. त्या पात्रांमुळे ती गोष्ट लोकांच्या स्मरणात राहते. कथेपेक्षा त्या कथेतील पात्रं लोकांच्या मनात घर निर्माण करतात. ‘जीव माझा गुंतला’ ही अशीच दोन वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाकांक्षी व्यक्तींची गोष्ट आहे. जे महत्वाकांक्षी तर आहेतच पण त्यासोबत आपल्या आसपासचे वाटावेत असे आहेत. कलर्स मराठीने यावेळेस वेगळी अशी कथा प्रेक्षकांना देण्याची संधी आम्हाला दिली आहे. या मालिकेचा लेखक आणि निर्माता म्हणून हे प्रचंड आव्हानात्मक काम आहे पण टेल-अ-टेल मिडीया, अशाच आव्हानात्मक कामांमध्ये यश मिळवणारी निर्मिती संस्था म्हणून ओळखली जाते. मालिकेसाठी नव्या कथा आणि त्यातली पात्रं हेच आमचं वैशिष्ट्य राहिलंय. तर आमच्या बाकीच्या लोकप्रिय असलेल्या आणि झालेल्या मालिकांसारखीच ही मालिकासुद्धा लोकप्रिय होईल आणि तुम्हाला आवडेल ह्याची आम्हाला खात्री आहे”.

    मालिकेचे निर्माते महेश तागडे म्हणाले, “टेल-अ-टेल मिडीयाने घाडगे & सून ह्या संकल्पनेसोबत कलर्स मराठी वाहिनीच्या मदतीने घवघवीत यश मिळवलं. या यशाच्या वाटचालीसोबतच आम्ही आता पुन्हा सज्ज झालोय एक नवी मालिका घेऊन. एका आगळ्या वेगळ्या कल्पनेसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कोरोनाच्या कठीण काळातसुद्धा मनोरंजन थांबलेलं नाही. सगळ्या नियमांचं पालन करत, प्रेक्षकांसाठी एक नवी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी आम्ही कलर्स मराठी वाहिनीसोबत नव्या जोशाने तयार आहोत. टेल-अ-टेल मिडिया निर्मित “जीव माझा गुंतला” ही घरातली धाकटी मुलगी जी रिक्षा चालवून आपल्या घराचा सांभाळ करते, अशा अंतराची विधिलिखित प्रेमकहाणी असणारी मालिका आहे”.

    दोन विरुद्ध विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्या तर ? अंतरा आणि मल्हारच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. मल्हार – अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे. तेव्हा नक्की बघा ‘जीव माझा गुंतला’ २१ जूनपासून सोम ते शनि रात्री ९.३०वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर!