vineet kumar in tryst with destiny

विनीत कुमार सिंग(Vineet Kumar Singh)या नावाला आज कोणत्यावी वेगळ्या ओळखीची गरज राहिलेली नाही. बऱ्याच चित्रपटांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्यानंतर ‘मुक्काबाज’मध्ये मुख्य भूमिकेत स्वत:ला सिद्ध करणारा विनीत पुन्हा एकदा एका आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’(Tryst With Destiny) या चित्रपटात विनीतचा मूकअभिनय सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाचं औचित्य साधत विनीतनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह बातचित केली.

    दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’मध्ये विनीत कुमार सिंगच्या जोडीला आशिष विद्यार्थी, सुहासिनी, जयदीप अहलवात, कनी कुसृती, पालोमी घोष, विक्टर बॅनर्जी, लिलेट दुबे, सहाना वासुदेवन आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

    विनीत म्हणाला की, सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेल्या ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’मध्ये प्रेक्षकांना एकूण चार कथा पहायला मिळतील. याची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यात सर्व कसलेल्या कलाकारांची फौज आहे. दिग्दर्शक प्रशांत नायर यांनी अतिशय प्रामाणिकपणे सादर केलेला विषय मनाला भिडतो. डिओपी अविनाश अरुण आहेत. माझी कथा खूप वेगळी असून, हा एक आवाज आहे. एका अशा गटातील लोकांचा, ज्यांचा आवाज कधीच वरपर्यंत पोहोचत नाही. एखाद्या व्यक्तीचे बेसिक राईटस एखाद्या परिस्थितीत कसे पायदळी तुडवले जाऊ शकतात, यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तर कसे बाहेर पडू शकता आणि ती परिस्थिती कशा प्रकारे तुम्हाला घेराव टाकते यावर भाष्य करणारी ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’मधील माझी स्टोरी आहे. ‘मुक्काबाज’ हा चित्रपट केल्यानंतर ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ माझ्याकडे आला. कथा खूप इंटरेस्टींग होती, पण हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी एक वेगळा प्रयोग होता. मीदेखील यासाठीच हा चित्रपट साईन करण्यामागे अँथॅालॅाजी हे कारण आहे. चार कथा असल्यानं चित्रपटाचा संपूर्ण भार माझ्या खांद्यावर नव्हता. चार कथांमध्ये विभागला जाणार असल्यानं यात एक मोठं एक्सपिरीमेंट करता येऊ शकेल असं वाटल्यानं ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ करण्याचा निर्णय घेतला. ‘मुक्काबाज’नंतर अनिष मुंद्रा यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’मध्ये माझी एंट्री झाली.

    जन्मालाच डेस्टिनी म्हणायचं का…
    ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ हे या चित्रपटाचं टायटल बरेच अर्थ सांगणारं आहे. आपले पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या एका भाषणाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. याबाबत मी जास्त बोलू शकणार नाही. प्रशांत नायर अधिक चांगल्या प्रकारे हे उलगडून सांगू शकतील. डेस्टिनीचं प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्व असतं. इथूनच खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या जीवनात फरक पडू लागतो. तुमचे माता-पिता कोण आहेत, ते काय काम करतात, ते जे काही काम करतात ते कोणत्या स्तरावर करतात हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं ज्या दिवशी तुमचा जन्म होतो, त्या दिवशी तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा फरक पडतो. तिथेच बऱ्याच गोष्टी ठरतात. याबाबत जास्त काही सांगणार नाही, पण सुरुवातीला कसे संस्कार होतात, पृथ्वीच्या कोणत्या कोनाड्यात जन्म घेतला त्यावर तुम्ही कोणती भाषा बोलणार हे ठरतं. या गोष्टी आपल्या हाती नाहीत. कोणत्या कुटुंबात जन्म घेतो त्यावर भाषा किती चांगल्या प्रकारे बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो या गोष्टी ठरतात त्या जन्मालाच डेस्टिनी म्हणायचं का… त्यानंतर कर्माला सुरुवात होते. कर्मालाही खूप महत्त्व आहे. कित्येकदा तिथं असणारी व्यक्ती जिथपर्यंत पोहोचू शकत नाही तिथपर्यंत खालून वर येत एखादा माणूस पोहोचतो. त्यामुळं कर्मही महत्त्वाचं आहेच.

    न बोलता सारं सांगणारा गौतम
    या चित्रपटात मी गौतम नावाचं कॅरेक्टर साकारलं आहे, जे बोलतच नाही. तो का बोलत नाही हे चित्रपटाच्या अखेरीस समजतं. आपला आवाज आपल्याला जाणवतो आणि आपण बोलण्याच्या माध्यमातून तो इतरांपर्यंत पोहोचवतो. याला जे जाणवतंय ते तो कोणाला सांगू शकत नाही. कारण त्याला फ्रिडम नाही. त्यामुळं न बोलता ही कथा कशा प्रकारे सादर केली जाऊ शकते यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. त्यानंतर हळूहळू हे अचिव्ह करू शकलो. यासाठी मी दिग्दर्शक प्रशांत यांचे आभार मानतो. एक चांगला चित्रपट बनला असून, नवीन प्रयोग केला आहे. निश्चितच लोकांना हा आवडेल. बऱ्याच इंटरनॅशनल फेस्टिव्हल्समध्ये याचं कौतुक करण्यात आलं आहे. याला ट्रायबेका फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कारही मिळाला आहे. तिथं मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नॅामिनेशनही मिळालं होतं. विविध आघाड्यांवर या चित्रपटानं इंटरनॅशनल पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

    डोळ्यांत दिसतं मनातील प्रतिबिंब
    ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’मधील कॅरेक्टर करणं खूप कठीण होतं. प्रत्येक कॅरेक्टर कलाकाराकडून काही ना काही अपेक्षा करत असतं. अशा प्रकारचं कॅरेक्टर जे बोलूच शकत नाही ते तुम्ही स्वत: जाणवू शकला नाहीत तर लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यांचे डोळे हे आरसा असतात. डोळे हे माईंडच्या ओपन एरियाचा चेहरा असतो. आपल्या मनात जे सुरू असतं त्याचं प्रतिबिंब डोळ्यांत उमटतं. त्यामुळं हे कॅरेक्टर साकारताना कुठे ना कुठे खोलवर जाऊन याची अनुभूती घेणं गरजेचं होतं. तसं केलं नसतं तर प्रेक्षकांपर्यंत ती गोष्ट पोहोचू शकली नसती. प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी शब्दांच्या पायघड्या नसल्यानं व्हायब्रेशन्सच्या माध्यमातून पोहोचायचं काम करायचं होतं. यात एक शॅाट खूप लांबलचक आहे. एक-दोन मिनिटांच्या या शॅाटमध्ये तो फक्त पाहतोय, पण त्या पाहण्यातून सर्व काही सांगून जातो. त्याला काय जाणवतंय हे पाहणाऱ्याला समजतं.

    हिरो बनण्यासाठी ‘मुक्काबाज’
    ‘मुक्काबाज’ हा चित्रपट बहिणीसोबत मी लिहिला होता. यामागं एकच उद्देश होता की मला हिरो बनायचं होतं. या शहरात मी हिरो बनण्यासाठी आलो होतो, पण मला कोणीही हिरो बनवलं नाही. त्यामुळं मी स्वत:च प्रयत्न करण्याचा विचार केला. कारण मला हिरो बनवणारी कोणतीही स्क्रीप्ट येत नव्हती. आता बरंच काम केलं असल्यानं स्वत:च प्रयत्न करूया असा विचार करून ‘मुक्काबाज’चं धाडस केलं. त्या चित्रपटानं खूप काही दिलं. अनुराग सरांनी सूत्रं हाती घेतल्यानं स्क्रीप्ट आणखी चांगली झाली. त्यांनी इंटरेस्ट दाखवल्यानंतर मला कसलीही चिंता नव्हती. त्या चित्रपटानं मला माझ्या जीवनातील १० वर्षे परत दिली. एक चांगला चित्रपट संघर्ष करणाऱ्या कलाकाराला बरंच काही देऊन जाते हे मी ‘मुक्काबाज’च्या वेळी फील केलं.

    प्रशांत लवकर समाधानी होत नाहीत
    प्रशांत दिग्दर्शक म्हणून खूप चांगले आहेत. ते लवकर समाधानी होत नाहीत. एखादा शॅाट झाला तरी आणखी चांगलं कसं होईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यात जेव्हा चांगला ताळमेळ असतो, तेव्हा बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत जातात. कित्येकदा विचार न केलेल्या गोष्टीही चांगल्या प्रकारे जुळून येतात आणि छान काम होतं. माझं कॅरेक्टर आम्ही सायलेन्ससोबत प्ले करत होतो. त्यामुळं हे सर्वांसाठी खूप चॅलेंजींग होतं. दिग्दर्शक आणि माझ्यासाठी तर होतंच, पण कॅमेरामनपासून सहकलाकारांपर्यंत सर्वांसाठीच एक वेगळं आव्हान होतं. प्रशांत पहिल्या दिवसापासून या प्रोजेक्टशी जोडले असल्यानं नेमकं काय सादर करायचंय हे त्यांना माहित होतं. प्रत्येक शॅाटमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायचे.

    कथा एकमेकांना क्राॅस करतात
    आशिष विद्यार्थींची कथा वेगळी असल्यानं त्यांच्यासोबत काम करायला मिळालं नाही. सर्व कथा कुठे ना कुठे तरी एकमेकांना क्राॅस करतात. हा चित्रपट बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. एक व्हॅाईस बनून समोर येते. खूप सर्व लोकांचा आवाज असणारी कथा आहे. लॅाकडाऊनच्या काळात आपल्याला खूप कथा ऐकायला मिळत होत्या. हे लोक इथेच होते, पण आपल्याला कुठे दिसत नव्हते. अचानक दिसू लागले होते. कुठे ना कुठे माझी कथा त्यापैकी कोणाची तरी असू शकते.

    मराठी सिनेसृष्टी हे कथांचं भंडार
    मराठीत काम करण्याचा खूप छान अनुभव आहे. अस्खलित मराठी बोलता येत नाही. लिहलेली वाक्यं मी धडाधड बोलू शकतो. मराठीत खूप छान कलाकार आहेत. मराठी सिनेसृष्टी हे कथांचं भंडार आहे. महाराष्ट्रात मी खूप फिरतो. मला लोकांमध्ये मिसळायला खूप आवडतं. काम संपलं की मी लोकांमध्ये मिसळतो. समाज हीच माझी लायब्ररी आहे. त्यांच्यासोबत उठतो, बसतो, त्यांच्यातील गुण-अवगुणांचं अवलोकन करतो आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. हे गुण नंतर एखाद्या कॅरेक्टरच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या कॅरेक्टरमध्ये बऱ्याच गोष्टी वास्तवात पाहिलेल्या असतात. महाराष्ट्रात खूप काही आहे. विदर्भ आणि कोकणात माझे बरेच मित्र आहेत. मुंबईत खूप काळापासून राहतोय. त्यामुळं इथल्या मातीवर विशेष प्रेम आहे. इथं खूप इमोशनल आणि स्ट्राँग कथा आहेत.