shankar baba

शंकरराव पापळकर गाडगेबाबांची नाळ घेऊन त्यांचा वसा चालवत आहेत. हे केवळ वाक्य नाही. तर, त्यांचे आचरणही असेच आहे.त्यांचा पापळकर.. शंकर..शंकरराव..ते शंकरबाबा हा प्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे

    महाशिवरात्र झाली…पारणेही.. पण सातपुड्यातील या शंकराने कधीच कशाची अपेक्षा केली नाही. सातपुड्याच्या डोंगरात वझ्झर गावात गेली अनेकवर्षे राहणाऱ्या शंकरराव पापळकर नावाच्या तपस्याला अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाने डी.लिट. देण्याचा निर्णय घेतला. आज खऱ्या अर्थाने विद्यापीठाने ‘एका विद्यापीठाचा सन्मान’ केला. शंकरराव गाडगेबाबांची नाळ घेऊन त्यांचा वसा चालवत आहेत. हे केवळ वाक्य नाही. तर, त्यांचे आचरणही असेच आहे.

    त्यांचा पापळकर.. शंकर..शंकरराव..ते शंकरबाबा हा प्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे. हा माणूस वयोमानाने ८० च्या पल्याड असेलही, पण त्यांची धडाडी तारुण्यसुलभ आहे. अफाट जनसंपर्क, प्रचंड धडपडण्याची उमेद आणि हे सारे टिकावे..वाढावे म्हणून जिभेवर साखर ठेवण्याची वृत्ती. गेली ३५ वर्षे हा त्यांचा प्रवास मी अत्यंत जवळून पाहतो आहे.. कडक खादीचा पण परीटघडीचा पांढरा शुभ्र खादीचा झब्बा पायजमा ते घालत. झब्याच्या कोनाला ते फाडून टाकीत…लहानसे भोक करीत; त्यातून सुताची तुसं दिसत. असे करण्यामागे त्यांचा समज भारी होता. गरिबीतून वर आलेला ‘मी’ असा कडक राहिलो तर लोक काय म्हणतील? असे म्हणताना, ते विसरुन जात,की आपल्याजवळ आजही तीनच झब्बे-पायजमे आहेत.

    आज या प्रश्नाचे उत्तर त्यांनी त्यांच्या अभूतपूर्व कष्टाने दिले.

    माझे काका रा. ना. पांडे, ज्यांना मी मोठेबाबा म्हणायचो. त्यांनी एकदिवस या माणसाला आमच्या घरात आणले. नक्की साल कोणते ते माझ्या लक्षात नाही. कळतही नव्हते अशा वयात शंकरकाका माझे वडील अं. ना. पांडे यांच्यासोबत त्यांच्या सायकलवर फिरत. एका हाती ‘देवकीनंदन गोपाला’ हे मासिक आणि दुसऱ्या खांद्यावर शबनम. बेसन, भात, भाकरी आई जेवणात वाढे; कधी डबा देई. सणावाराला काका आणि देवाचे ताट असेच समीकरण असे..म्हणजे, स्वतः पापळकर काका सांगतात,“मी या घरी पहिल्यांदा आलो, त्यादिवशी घरी कुठलासा सण होता. मला बघून तुझे बाबा मला हात धरून देवघरात घेऊन गेले. मी नमस्कार केला. ते सोवळ्यात होते. मी त्यांना म्हटले, भाऊसाहेब मी धोबी आहे. तुम्ही देवघरात आणले. तेव्हा, त्यांनी प्रसाद हातावर दिला आणि देवाचे ताट माझ्यासमोर केले. मी जेवलो. तुमच्या घराजवळ महाराष्ट्र केसरी संजय तीरथकर राहायचे. त्यांच्या वडिलांना हा प्रसंग सांगितला. त्यानंतर कैकदा मग हा क्रम होता.”

    माणुसकीच्या या निर्मळ जिव्हाळ्यावर शंकरकाका गेली अनेक वर्षे आमच्या घरात आहेत.

    गाडगेबाबा आणि शंकरराव पापळकर यांच्यातील अनेक साम्यस्थळे आहे. जी अनुयायांत असतात; ती सारीच. पापळकरकाका आणि गाडगेमहाराज बरेचदा एकत्र असायचे. कधी कीर्तन तर कधी फ़िरस्ती. गाडगेबाबा अमरावतीच्या इर्विन हॉस्पिटलमध्ये भरती होते. १८ डिसेंबर १९५६ हा तो दिवस.. गाडगेबाबांनी त्यांची पांघरायची घोंगडी शंकरराव पापळकर नावाच्या अनुयायास दिली…ती कायम त्यांच्या खांद्यावर आहे. या घोंगडीचा स्पर्श व्हावा म्हणून  आर आर आबा पाटील यांनी पापळकरांची खास भेट घेतली होती.

    अमरावतीत गाडगेबाबांच्या समाधिमंदिराजवळ तुकाराम पाटील नावाची एक चाळ होती. तिच्या वरच्या माळ्यावर पापळकरांचे  कार्यालय होते. अत्यंत साधे आणि आपुलकी जाणवू देणारे.

    ‘देवकीनंदन गोपाला’ या मासिकाचे शंकरराव पापळकर संपादक होते. हे मासिक गाडगेबाबाच्या विचारांचा पुरस्कार करणारे. पण, आजपासून पस्तीस वर्षांपूर्वी देशभरातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेच्या बहुरंगी जाहिरात घेणारे मासिक. मासिकाच्या दिवाळी अंकात देशातील मोठी उदयॊगघराणी जाहिराती देत. टाटा समूहाच्या अनेक प्रोडक्टच्या जाहिराती  याच मासिकात असायच्या…आणि शंकरराव पापळकर नावाच्या पत्रकाराला टाटा थेट ओळखायचे. या नावाच्या बरोबरीने अजून कोणती नावे सांगू? अव्वल दर्जाचे साहित्यिक या मासिकात लिहायचे. त्यांना पापळकर अंक पाठवायचे, मानधन द्यायचे. दिवाळीत मिठाईचा पुडा न विसरता दिवाळी अंकासह मिळत असे. आचार्य रजनीश, जे. कृष्णमूर्ती, भीमसेन जोशी, माधवराव गडकरी, विद्याधर गोखले, गो.नी. दांडेकर, करंदीकर, राम शेवाळकर, शांताराम, दादा कोंडके, अरुण साधू, जगदीश खेबुडकर अशी दिग्गज मंडळी लिहायची. राजकारणी आवर्जून लिहायचे. अमरावतीला विद्यापीठ व्हावे म्हणून त्यांनी एक अंक काढला होता. सुधाकरराव नाईक, सूर्यकांत जोग, रा.सु.गवई यांच्यासह काही अधिकाऱ्यांचे लेख त्यात होते.  छपाईचा दर्जा, कागदाकडे त्यांचे बारीक लक्ष असे.

    म्हणूनच, पत्रकार शंकरराव पापळकर ते शंकरबाबा पापळकर यांचा सामाजिक वावर विद्यापीठापेक्षा कमी नाही.

    अगदी थेट लिहायचे तर बेवारस म्हणून सापडलेली लहान मुले १८ वर्षांपर्यंत बालसुधारगृहात राहू शकतात. नंतर त्यांचे तेथील दाणापाणी संपते. त्यानंतर पुढे त्यांचे काय होते? बालसुधारगृहातून पुन्हा बाहेर पडणार्‍या या बेवारस दिव्यांग मुलामुलींचे जीवन वाचवा, अशी हाक मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्यांग बालसुधारगृहाचे प्रमुख शंकरराव पापळकर यांनी दिली…आणि दिव्यांगांचे नवे आयुष्य जगापुढे आले.

    काळाच्या ओघात उन्हापावसाने रापलेला त्यांचा चेहरा आता वयाच्या ८० व्या वर्षीही लहान मुलांच्या ‘उज्ज्वल उद्यासाठी’ उमेद ठेवून आहे. मागील २९ वर्षे पापळकर वझ्झरच्या बालसुधारगृहातून लहान मुलामुलींचे संगोपन करतात. या बालसुधारगृहातील मुलामुलींची लग्ने लावून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा ध्यास त्यांनी घेतला.साहजिकच शंकरराव पापळकर ही व्यक्ती ‘शंकरबाबा’ म्हणून लौकिकास पात्र ठरली. समाजाच्या ढोंगीपणाला नाकारून त्यातील चांगुलपणा शोधून शंकरबाबांनी आजवर २४ बेवारस दिव्यांग मुलामुलींची लग्ने लावली.

    बाबांच्या सुधारगृहात असलेली सारीच मुले-मुली बेवारस आहेत. कुठे नालीतून, मंदिरात, रेल्वे-बसस्थानकांवर ही दिव्यांग मुले एक-दोन वर्षांची असताना सापडली. हाताच्या फोडाप्रमाणे त्यांच्यावर माया लावल्यानंतर ती १८ वर्षांची झाली की त्यांना बाहेर काढा, असा भन्नाट सरकारी नियम आहे. १८ वर्षांची तरुण मुलगी मग कुठे जात असेल? हा प्रश्न मोठा जिव्हारी लागणारा आहे. समाज अशांसाठी किती साह्यभूत ठरतो ? किंवा परिस्थितीला शरण जाऊन मग ही तरुण मुलगी नेमकी कोणता मार्ग शोधत असेल? उत्तरालाच अनाथ करणारेच हे सारे प्रश्न. खरंच, सरकारी गतिमंदता केव्हा संपेल? मागील पंधरा वर्षांपासून शंकरबाबा मुख्यमंत्री, राज्य व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय विभागाच्या झाडून सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांना भेटले. त्यांना या प्रश्नाची भीषणता समजावून सांगितली. नक्की काहीतरी करू, या बिनबुडाच्या उत्तराने शंकरबाबांची बोळवण केली गेली. बेवारस, गतिमंदासाठी कायमस्वरूपी पुनर्वसन कायदा केला पाहिजे, ही त्यांची मागणी आहे.

    शंकरबाबा सांगतात, “देशातील सर्वच सुधारगृहांमधून दरवर्षी १८ वर्षांवरील तब्बल एक लाख मुले-मुली बाहेर पडतात.” महाराष्ट्रात दहा सुधारगृहे आहेत. दोन सरकारी व आठ सामाजिक संस्थांकडून चालविली जातात. यातून दरवर्षी सात ते आठ हजार मुले- मुली बाहेर काढली जातात. तरुण मुली कुठे जात असतील? त्यांचा ठावठिकाणा काय? वझ्झरच्या बालसुधारगृहातून आजवर एकही १८ वर्षांवरील मुलगी बाहेर काढण्यात आलेली नाही. त्याचे कारण सांगताना, शंकरबाबा म्हणतात, ‘आम्ही सरकारी अनुदान घेत नाही. त्यामुळे तरुण मुलींना बाहेर काढण्याचा हा सरकारी नियम लागू होत नाही. इतर संस्था अनुदान घेतात, त्यामुळे तिथे माया, लळा व लोभ नाही. तिथे फक्त कायदा व नियम आहेत.”

    शंकरबाबांनी त्यांच्या सुधारगृहातील सर्वच मुलामुलींना स्वत:चे नाव वडील म्हणून दिले. १२३ मुले-मुली शंकर पापळकर हे नाव लावून राहतात. त्या सर्वांचे आधारकार्ड, रहिवासी दाखले काढण्यात आले. ज्या बेवारसांची लग्न पापळकरांनी लावून दिली, त्यातील १७ जोडपी वझ्झरलाच राहतात. त्यांच्यातील १४ मुलींना सुदृढ अपत्यप्राप्तीही झाली. या सर्वांचे संगोपन शंकरबाबांच्या देखरेखीत सुरू आहे. समाजातील दानशूर मंडळी सुधारगृहाला देगणी देतात, त्यातून गाडा चालतो.

    मला एक प्रसंग आठवला. वीस वर्षांंपूर्वी शिर्डीच्या साईमंदिराबाहेर सापडलेली बेवारस मुलगी आता मोठी झाली. तिचे नाव मंगल ! रावेर येथील मूकबधिर योगेशसोबत जळगावला विवाहबद्ध झाली.. ते म्हणाले, हे मंगलचे म्हणजे, आपल्या परिवारातील विसावे लग्न पार पडले की लग्नाचे सोहळे थांबविण्याचे ठरवितो आहे. जड अंत:करणाने ते सांगत होते, १८ वर्षांवरील मुलींना बाहेर न काढता त्यांचे सुधारगृहातच संगोपन करण्यासाठी सरकार कधी काढेल जीआर? सांगून सांगून थकलो आता. कुणीच ऐकत नाही. माझं वयही झाले. मुलींचे चेहरे पाहिले,की कासावीस होतो.

    पण, यंदाही त्यांनी एका मुलीचे लग्न लावले. कारण, बाप हा बापच असतो.

    त्यांचे मूळगाव परतवाडा. कर भरू न शकल्याने त्यांच्या घरावर जप्ती आली. १९७५ मध्ये त्यांनी परतवाडा सोडले. अमरावतीच्या अंबापेठमध्ये भाड्याच्या खोलीत राहिले. ते आजही तीच स्थिती आहे. त्यांचा एकही नातेवाईक त्यांच्या सोबत संस्थेत नाही. संपूर्ण जबाबदारी दिव्यांग सांभाळतात. त्यांच्या जेवणाची सोय हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रमुख प्रभाकरराव वैद्य करतात.तर, कपडेलत्ते शेगाव संस्थांचे प्रमुख शिवशंकरभाऊ पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार  पुरवतात. सामाजिक जाणिवांची ही एक ‘अजिबोगरीब’ चित्तरकथा आहे.

    एकवर्षी पंतप्रधानांनी ‘मन की बात’मधून मूकबधिर- विकलांगांना ‘दिव्यांग’ म्हटले. सामाजिक सन्मान देण्याचा प्रयत्न; पण प्रत्यक्षात शब्द बदलून होणार नाही. दिव्यांगाची कायमस्वरूपी सोय लावावी लागेल…

    वझ्झरला सुधारगृहाच्या २४ एकरात या दिव्यांग मुलांनी १५ हजार झाडे लावली. ती डेरेदार फुलली. आता ते बाबा झाले आहेत. त्यांचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत पण कर्तृत्ववाने डी.लीट बहाल केली.

    शिक्षण म्हणजे नक्की काय? तर माणूस घडविणे.समाजाला माणूसपण देणे..

    आज सकाळी बोललो.. म्हणाले, जोवर मुलांचा प्रश्न निकाली निघत नाही, तोवर कोणताही सन्मान घेणार नव्हतो. पण गाडगेबाबांच्या नावाने हा सन्मान आहे.. जगण्याचा श्वास मी नाकारू कसा ?

    गडगडाटी हास्य अनुभववत त्यांनी एक शेर म्हटला. अर्थात, नेहमीच संभाषणाचा शेवट असाच असतो.

    शंकरबाबा म्हणाले –

    ” हातों के लकिरों के,

    फरेंबो मत आना,

    जोतिष कें दुकानों में,

    किस्मत नही बिकती..”