Diabetes ची काळजी आणि सेवा-सुविधांमधील अडचणी

पहिल्या लाँगीट्युडनल एजिंग स्टडी ऑफ इंडियामध्ये दर्शवण्यात आले आहे की, ४५ पेक्षा जास्त वयाच्या ११.५% भारतीयांच्या रक्तामध्ये शर्करेचे प्रमाण वाढलेले (Blood Sugar Level Increase) असते. अशा सर्व परिस्थितीमुळेच भारताला ‘जगाची मधुमेह राजधानी’ (India is the Diabetes Capital of the World) म्हटले जाते.

    डॉ. महेश चव्हाण

    संपूर्ण जगभरात मधुमेहाचा (Diabetes) आजार झपाट्याने पसरत आहे. आताच्या घडीला जगभरात वयस्क मधुमेहींची संख्या ५३७० लाख असून २०३० सालापर्यंत ती ६४३० लाखांवर पोहोचेल असे अनुमान आहे. भारतात (India) मधुमेहाच्या प्रसाराचा वेग प्रचंड जास्त आहे, नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतात ७७० लाखांहून जास्त लोक मधुमेहाने ग्रस्त असून २०४५ सालापर्यंत ही संख्या दुपटीने वाढून १३४० लाख झालेली असू शकेल.

    पहिल्या लाँगीट्युडनल एजिंग स्टडी ऑफ इंडियामध्ये दर्शवण्यात आले आहे की, ४५ पेक्षा जास्त वयाच्या ११.५% भारतीयांच्या रक्तामध्ये शर्करेचे प्रमाण वाढलेले (Blood Sugar Level Increase) असते. अशा सर्व परिस्थितीमुळेच भारताला ‘जगाची मधुमेह राजधानी’ (India is the Diabetes Capital of the World) म्हटले जाते.

    मधुमेहींनी सर्वात जास्त आणि सर्वाधिक विविधता असलेल्या लोकसंख्येचा एक देश भारतामध्ये मधुमेह झालेल्या व्यक्तींची नीट काळजी घेता यावी यासाठी आवश्यक असलेल्या सेवासुविधांच्या उपलब्धतेमध्ये अनेक मोठ्या अडचणी भेडसावतात. मधुमेहींची सतत वाढती संख्या आणि या आजारामुळे होणाऱ्या गंभीर गुंतागुंतीचा धोका लक्षात घेता, ही नक्कीच चिंतेची बाब आहे आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या जाणे ही काळाची गरज बनली आहे.

    मधुमेहामुळे अकाली मृत्यू ओढवण्याचा धोका वाढतो, कार्यक्षमतेवर, उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो आणि या सर्वांचा परिणाम फक्त रुग्ण व्यक्ती आणि समाज यापुरताच मर्यादित न राहता संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होतो.

    डॉ. महेश चव्हाण, कन्सल्टन्ट, एंडोक्रिनॉलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले मधुमेहामध्ये काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवासुविधा उपलब्ध होण्यात येत असलेल्या अडचणींमध्ये अनेक सामाजिक-आर्थिक घटक व वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेचा समावेश आहे. भारतीयांमध्ये मधुमेहाविषयी आणि खास करून त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर गुंतागुंतींविषयी सर्वसामान्य जागरूकतेचा अभाव आहे. दुर्गम भागांमध्ये ही समस्या अधिक गंभीर होते कारण त्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या, देखरेखीसाठी आवश्यक उपकरणांच्या आणि औषधांच्या कमतरतेची भर पडते. यामुळे व्यक्तीला मधुमेह आहे हे लक्षात येण्यास आणि त्याचे निदान केले जाण्यास उशीर होतो, सहाजिकच समाजावरील मधुमेहाचे ओझे अधिकच वाढते.

    टाईप २ मधुमेह दीर्घकाळपर्यंत लक्षात येत नाही, त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या दृष्टिदोषासारख्या एखाद्या गुंतागुंतींशी संबंधित तपासण्यांमध्ये किंवा एखाद्या वेळी करण्यात आलेल्या रक्त तपासणीमध्ये अचानक समजून येते व्यक्तीला मधुमेह झालेला आहे. पण तोवर बराच उशीर झालेला असू शकतो ज्यामुळे गुंतागुंत तसेच मृत्यू ओढवण्याची शक्यता देखील वाढते.मधुमेहामध्ये काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवासुविधांच्या उपलब्धतेच्या आड येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी काय करता येईल? यापैकी बहुतांश अडचणींवर खालील उपायांमुळे मात करता येईल.

    मधुमेहाबाबत जागरूकता आणि माहिती:

    मधुमेह हा आजार आणि त्यामुळे निर्माण होणारी गंभीर गुंतागुंत टाळण्यामध्ये हा घटक खूप महत्त्वाचा ठरतो. मधुमेहाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीच्या प्रभावी उपक्रमाच्या माध्यमातून मधुमेहाबाबत, या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या धोक्यांबाबाबत, जसे, कौटुंबिक पार्श्वभूमी, स्थूलपणा, ताण आणि हायपरटेन्शन इत्यादी, आणि मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीविषयी जागरूकता निर्माण केली गेली पाहिजे.

    शारीरिक हालचाली करणे, निरोगी आहार घेणे, मद्यपान व धूम्रपान टाळणे तसेच तणावमुक्त जीवन जगल्याने मधुमेहाचा धोका कमी करता येऊ शकतो हे देखील यामधून ठळकपणे सांगितले गेले पाहिजे.हा जागरूकता प्रसार समाजात विविध ठिकाणी करण्यात आला पाहिजे तसेच क्लिनिकमध्ये जेव्हा एखाद्या रुग्णाच्या बाबतीत मधुमेहाचे निदान केले जाते तेव्हा त्याला/तिला देखील याबाबत सर्व माहिती दिली गेली पाहिजे.जनरल प्रॅक्टिशनर्सचे प्रशिक्षण आणि सामाजिक उपक्रम यांच्या मार्फत मधुमेहाविषयी जागरूकतेला प्रोत्साहन देण्यात आरोग्यसेवा संघटनांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. यामध्ये मधुमेहींनी पायांविषयी घ्यावयाची काळजी, पावलांना अल्सरेशन आणि पाय काढून टाकावा लागणे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतच्या माहितीचा देखील समावेश असला पाहिजे.

    तंत्रज्ञान :

    आज अशी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत जी रुग्ण व्यक्तींना औषधे, शारीरिक हालचाली आणि योग्य आहार यांची वेळेवर आठवण करून देण्याबरोबरीनेच आखून दिलेल्या गोष्टींचे पालन करण्यात मदत करू शकतात. यामुळे औषधे वेळेवर घेऊन आणि आपल्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणून रक्तातील शर्करा नियंत्रणात ठेवून रुग्ण व्यक्ती आपल्या स्वतःचे आरोग्य चांगले राखू शकतात. वापरायला अतिशय सोपे आणि रुग्णांच्या दिनचर्येचा भाग बनून जाईल असे ऍप किंवा डिव्हाईस सर्वात चांगले असते. सर्वोत्तम तंत्रज्ञानामध्ये देखील मधुमेहाविषयी माहिती असणे ही सातत्यपूर्ण पालन आणि यशस्वी परिणाम यांची गुरुकिल्ली आहे. युजर्सना गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्यांनी सर्व नियमांचे नीट पालन करावे यासाठी नवीन ऍप्लिकेशन्समध्ये गेमिफिकेशनचा वापर करण्यात येतो.

    टेलीमेडिसिन :

    कोविड महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात टेलीमेडिसिन सुविधा अनेक मधुमेही रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरली. दूर राहून देखील काळजी आणि देखभाल प्रदान करण्याच्या या सुविधेमुळे, गंभीर कोविड होऊ शकण्याचा धोका असलेल्या रुग्णांना डॉक्टरकडे जाण्यासाठी प्रवास करणे टाळून स्वतःला संसर्गापासून वाचवता आले. टेलीमेडिसिनमुळे रुग्णांच्या आधीपासून सुरु असलेल्या उपचारांमध्ये साहाय्य पुरवले जाऊ शकते.

    काळजी, देखभाल आणि स्वतःचे आरोग्य यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात, गुंतागुंत तसेच मधुमेहामुळे निर्माण होणारे एकंदरीत आर्थिक ओझे कमी करण्यात जागरूकता, माहिती, तंत्रज्ञान व टेलीमेडिसिन या सर्वांची खूप मदत होऊ शकते. या सर्वांची अंमलबजावणी योग्य प्रकारे व सक्षमतेने करण्यात आल्यास डायबेटीस मेलिटस आणि त्यामुळे निर्माण होणारे इतर गंभीर धोके टाळण्यात व त्यांवर नियंत्रण ठेवण्यात मदत मिळेल.

    (लेखक कन्सल्टन्ट-एंडोक्रिनॉलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे कार्यरत आहेत.)