अन्न व्यावसायिक परवाना व नोंदणी प्रक्रिया; ‘या’ तारखेपासून सुरू होणार मोहीम 

जे अन्न व्यवसायिक विनापरवाना, विनानोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांचे विरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्याची तरतुद असुन त्यामध्ये रुपये ५ लाखापर्यंत द्रव्यदंड व सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते.

    गडचिरोली (Gadchiroli) : अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली कार्यालयातर्फे सव अन्न व्यावसायिकांना सुचित करण्यात येते की, अन्न व्यवसाय करण्यासाठी त्यांची अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत परवाना/नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा. ज्यांची वार्षिक उलाढाल रुपये १२ लाखापेक्षा जास्त आहे. त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल रुपये १२ लाखापेक्षा कमी आहे, त्यांनी नोंदणी करुन घ्यावी.

    जे अन्न व्यवसायिक विनापरवाना, विनानोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांचे विरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्याची तरतुद असुन त्यामध्ये रुपये ५ लाखापर्यंत द्रव्यदंड व सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते.

    परवाना व नोंदणी ऑनलाईन अर्ज करावयाचे असुन आवश्यक कती कागदपत्रे अपलोड करुन विहित नमुन्यात अर्ज करुन ऑनलाईन शुल्क भरुनच व्यवसाय करावा. ऑनलाईन अर्ज करण्याकरीता FSSAI.GOV.IN या संकेतस्थाळावर अर्ज करावा. त्यावर अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व तत्सम बाबीसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

    अन्न व्यवसायिकांनी परवान्याची व नोंदणीची मुदत संपण्यापुर्वी ऑनलाईन पध्दतीने परवाना व नोंदणी तत्काळ नुतनिकरण करुन घ्यावे. गडचिरोली कार्यालायतर्फे १ ऑक्टोंबर ते ७ ऑक्टोंबर २०२१ या कालावधित उपरोक्त बाबींचा विचार करुन अन्न व्यवसायिकामध्ये अन्न परवाना नोंदणी घेण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तरी सर्व किरकोळ विक्रेते घाउक विक्रेते, भाजिपाला फळे विक्रेते, पाव भाजी पानीपुरी विक्रेते, अंडे, मास-मटन विक्रेते, मासे विक्रेते तसेच उत्पादक यांनी त्वरीत अन्न परवाना नोंदणी करुन घ्यावी.

    तसेच गडचिरोली जिल्हयातील सर्व अन्न व्यवसायिकांनी त्यांनी विक्रीबीलावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत मिळालेल्या परवाना किंवा नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक आहे. असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली अभय देशपांडे यांनी केले आहे.