
समाजमनातून भूतप्रेतांची अवास्तव भीती आणि स्मशानाबाबतचा नकारात्मक दृष्टिकोन दूर सारण्यासाठी पंचवीस वर्षांपूर्वी अ.भा.अंनिस द्वारे वर्ध्यात लोकजागर होलिकोत्सव सुरू करण्यात आला.
वर्धा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व तालुका शाखेद्वारे गुरुवार १७ मार्च रोजी सव्वीसावा लोकजागर स्मशान होलिकोत्सव आयोजित करण्यात आला असून, यात ‘तीन गझलकारा’ ही गझलकाव्य मैफल सादर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे स्थानिक स्मशानभूमीत होळी पौर्णिमेला सायंकाळी ७.३० वाजता हा लोकजागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
समाजमनातून भूतप्रेतांची अवास्तव भीती आणि स्मशानाबाबतचा नकारात्मक दृष्टिकोन दूर सारण्यासाठी पंचवीस वर्षांपूर्वी अ.भा.अंनिस द्वारे वर्ध्यात लोकजागर होलिकोत्सव सुरू करण्यात आला. प्रबोधन आणि मनोरंजन यांची सांगड घालणा-या उपक्रमात आजतागायत अनेक मान्यवरांनी कलेचे सादरीकरण आणि विचारांची मांडणी केली आहे. कोरोनाकाळातील मनावरची मरगळ झटकून टाकत सुज्ञ नागरिकांनी, युवक युवतींनी मित्रपरिवारासह या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अ.भा. अंनिसच्या युवा शाखेचे सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
‘गुरुवारी तीन गझलकारांचे’ काव्यवाचन मैफल
या मैफलीत प्रीती तडस वाडीभस्मे, वृषाली मरतोडे आणि कांचन कानतोडे या नव्या पिढीतील सशक्त वर्धेकर गझलकार आपल्या रचना सादर करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. अंनिसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा कवी संजय इंगळे तिगावकर राहणार असून गझलकार विद्यानंद हाडके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. मैफलीचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका ज्योती भगत करतील.