देशात पहिल्‍यांदाच होणार ‘श्रमगणना’ ; कामगार, मजूर, व्यावसायिकांचा निश्चित आकडा मिळणार

दिल्ली:  देशात पहिल्यांदा श्रमगणना करण्यात येणार आहे. श्रम मंत्रालयाकडून या संबंधीची तयारी केली जात आहे. मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या 'लेबरब्युरो' कडून देशातील प्रत्येक क्षेत्राशी निगडीत व्यक्तींची गणना करण्यात येईल. देशात किती डॉक्टर, अभियंते, वकील, सीए, मजूर, माळी, स्वयंपाकी, चालक आहेत यासंबंधीची आकडेवारी एकत्रित करण्यात येणार आहे. जानेवारी-२०२१पासून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

दिल्ली:  देशात पहिल्यांदा श्रमगणना करण्यात येणार आहे. श्रम मंत्रालयाकडून या संबंधीची तयारी केली जात आहे. मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ‘लेबरब्युरो’ कडून देशातील प्रत्येक क्षेत्राशी निगडीत व्यक्तींची गणना करण्यात येईल. देशात किती डॉक्टर, अभियंते, वकील, सीए, मजूर, माळी, स्वयंपाकी, चालक आहेत यासंबंधीची आकडेवारी एकत्रित करण्यात येणार आहे. जानेवारी-२०२१पासून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

दर ३ महिन्यांनी होणार गणना
सध्या ही गणना सहा महिने तसेच भविष्यात दर तीन महिन्यांनी केली जाईल. वैज्ञानिक सर्वेक्षणाचा आधार त्याकरिता घेण्यात येईल. सर्वेक्षणासंबंधीच्या पद्धती संबंधी येत्या १५ दिवसांत स्पष्ट धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती लेबर ब्युरोचे महासंचालक डीपीएस नेगी यांनी दिली.

टीमला देणार प्रशिक्षण
जिल्हापातळीवरील कंपन्या, कार्यालये, रुग्णालये, रहिवासी कल्याण संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची आकडेवारी सर्वेक्षणातून एकत्रित केली जाईल. जिल्हा, राज्य तसेच केंद्रस्तरावर ही गणना केली जाणार असून सर्वेक्षण करणाऱ्या टीमचे प्रशिक्षण येत्या दोन महिन्यांत पूर्ण केले जाईल, असेही नेगी म्हणाले. कामगार, मजूर, व्यावसायिकांची माहिती राज्यांकडून दिली जात नाही अथवा माहिती पुरविण्यात विलंब केला जातो. त्यामुळे श्रमगणना आवश्यक आहे. कायद्यात बदल करून लेबर ब्युरोला त्यामुळे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. सर्व व्यावसायिकांना सोशल सिक्युरिटी नेटवर्कसोबत जोडण्यात येणार आहे.

कामगारांसंबंधी निश्चित आकडेवारी मिळणार

  • आकडेवारीच्या आधारे धोरणांमध्ये अपेक्षित बदल करण्यात येईल तसेच कामगारांच्या वेतनासंबंधीही विचार केला जाईल, असे  मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
  •  कोरोना रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचे चटके असंख्य स्थलांतरित मजुरांना बसले होते.
  • विविध शहरांहून मजुरांचे जत्थेच्या जत्थे गावाकडे पायपीट करीत असल्याचे भीषण चित्र बघून अवघा देश हळहळला होता.
  •  अशा स्थितीत किती मजूर स्वगृही परतले आणि किती मजूर शहरात पुन्हा आले याची आकडेवारी कुणाकडेच नव्हती.
  • श्रम गणनेतून मजुरांसह इतर कामगारांसंबंधीची निश्चित आकडेवारी केंद्राला प्राप्त होईल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.