“महापंचायतीसाठी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केलात तर….” राकेश टिकेत यांनी दिला इशारा

“महापंचायतीसाठी किती लोक येतील, हे सांगणं शक्य नाही. मात्र मोठ्या संख्येनं लोक पोहोचतील एवढं नक्की. शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कुणीही जर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू,” असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

    केंद्राच्या कृषी कायद्यांना(Agricultural Bill) विरोध करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने रविवारी मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे(Farmers Mahapanchayat) आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait)यांनी म्हटले आहे.

    “महापंचायतीसाठी किती लोक येतील, हे सांगणं शक्य नाही. मात्र मोठ्या संख्येनं लोक पोहोचतील एवढं नक्की. शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कुणीही जर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू,” असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधून सुमारे दोन हजार शेतकरी मुझफ्फरनगरला पोहोचण्याची शक्यता आहे. ते अमृतसरहून पहाटे ४ वाजता, जालंधरमधून सकाळी ५ वाजता आणि लुधियानाहून सकाळी ६ वाजता एक्स्प्रेस ट्रेन पकडतील.

    दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळावरून ४०० ते ५०० शेतकरी महापंचायतीकडे रवाना होतील. टिकरी आणि गाजीपूर सीमेवरून शेतकरी बसने मुझफ्फरपूरसाठी निघत आहेत. शुक्रवारी रात्री दोन बस मुझफ्फरनगरसाठी रवाना झाल्या, आज शनिवारी सकाळी आणखी दोन बस गेल्या असून इतर बस रात्री शेतकऱ्यांना घेऊन निघतील. महापंचायतीसाठी गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, असंही राकेश टिकैत यांनी सांगितलं. तसेच हरियाणा, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांतील शेतकरीही महापंचायतील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता टिकैत यांनी वर्तवली. शेतकऱ्यांना मुजफ्फरनगरला नेण्यासाठी ५०० बसेस भाड्याने घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

    “ही महापंचायत केवळ निवडणुकीशी जोडलेली नाहीए. युपीमध्ये सहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. तिथले शेतकरी अडचणीत आहेत. यूपीमध्ये विजेचे दरही सर्वाधिक आहेत. २०१६ पासून उसाच्या दरात वाढ झालेली नाही. केवळ पाच रुपये, पाच पैसे प्रति किलोने दरात वाढ करून तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करताय का? ” असा सवालही राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला केला आहे.