rice on ration shop

तांदूळ हा एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्याशिवाय आपले जेवणाचे ताट अपूर्ण मानले जाते. भारताने सध्या काही काळ तांदळाच्या निर्यातीवर (Export of Rice) बंदी घातली आहे. याचा परिणाम आता जगभरातील देशांमध्ये दिसून येत आहे. अनेक देशांमध्ये तांदळाचे दर (Rice Price Increases) गगनाला भिडल्याने लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे.

    नवी दिल्ली : तांदूळ हा एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्याशिवाय आपले जेवणाचे ताट अपूर्ण मानले जाते. भारताने सध्या काही काळ तांदळाच्या निर्यातीवर (Export of Rice) बंदी घातली आहे. याचा परिणाम आता जगभरातील देशांमध्ये दिसून येत आहे. अनेक देशांमध्ये तांदळाचे दर (Rice Price Increases) गगनाला भिडल्याने लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे.

    आशियाई बाजारात सध्या तांदळाच्या किमती 15 वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. यानंतर थायलंड आणि व्हिएतनामचा क्रम लागतो. भारताने 20 जुलैला तांदूळ आणि इतर धान्यांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, गेल्या आठवड्यातच ही बंदी आणखी कडक करण्यात आली. परबोल्ड आणि बासमती तांदळाच्या निर्यातीवर आणखी निर्बंध घालण्यात आले. त्याचा थेट परिणाम भारतातून तांदूळ आयातीवर अवलंबून असलेल्या देशांमध्ये दिसू लागला आहे. यामुळे आशियाई बाजारात सध्या तांदळाचे भाव गगनाला भिडले आहेत.

    कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम

    जागतिक बाजारात तांदळाची किंमत सध्या 646 डॉलर प्रति टन आहे. मात्र, या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदा भारतात कमी पावसामुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम झालाय. त्यातच थायलंडमध्येही दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तांदळाची किंमत आणखी वाढू शकते. याउलट, चीनमध्ये मात्र तांदळाचे उत्पादन चांगले झाले. त्यामुळे चीन ही कसर भरून काढण्याची शक्यता आहे.

    निर्यातीवर बंदी का घातली?

    देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तांदूळ महागला. हे पाहता केंद्र सरकारने देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी तांदुळाच्या निर्यातीवर बंदी घातली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर जुलै महिन्यात बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. त्याच वेळी, गेल्या आठवड्यात, परबोल्ड आणि बासमती तांदळावर अधिक कडक निर्बंध लादल्या गेले.