“नियमांचं पालन करा अन्यथा भारत जोडो यात्रा थांबवा” आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचं राहुल गांधींना पत्र

देशातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना हे पत्र लिहिलं आहे

    मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचं संकट पुन्हा घोंगावू लागलं आहे. सध्या चीनमध्ये तर कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. भारतात कोरोनाचा ससंर्ग कमी झाला असला तरी जगभरातील स्थिती पाहता खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्र लिहित भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) थांबवण्याचे आवाहन केले आहे.

     

    केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिलं आहे.  ‘भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. यात्रेत होणारी गर्दी पाहता खबरदारी घेण्याची गरज आहे. जर यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असं देखील मांडवीय यांनी म्हण्टलय.

    पत्रात नेमकं काय

    “कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरटचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी. असं आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हण्टलयं.

    पत्रावरुन कॉंग्रेसची भाजपवर टिका

    केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच पत्र मिळाल्यानंतर कॉंग्रेसन भाजपवर टीका केली आहे. देशात भारत जोडो यात्रेदरम्यान कॉंग्रेसला मिळणारे प्रेम पाहून भाजप घाबरली असं  कॉंग्रेसने म्हण्टलंय. कॉंग्रसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, आरोग्यमंत्र्याच्या पत्रावरून भारत जोडो यात्रेला भाजप किती घाबरली आहे हे दिसून येते. ट्रम्पजींना नमस्ते म्हणताना, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडताना, बंगालमध्ये प्रचार करताना, तेव्हाच्या आरोग्य मंत्र्याने मोदीजींना हा सल्ला देण्याची हिंमत दाखवली असती तर देशात कोरोना वाढला नसता. यात्रा योग्य मार्गावर आहे हे स्पष्ट केले आहे. असा टोला त्यांनी यावेळी लगावला.