बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी शिवसेनेचा कार्यकर्ता थेट आसाममध्ये पोहोचला; पोलिसांनी घेतले ताब्यात

गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना ठेवण्यात आले आहे. या आमदारांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले हे त्या हॉटेलजवळ पोहोचले होते. मात्र त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    गुवाहाटी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे भाजपच्या नेत्यांसोबत पुढची रणनीती आखणार असल्याचेही कळते आहे. एकनाथ शिंदे  हे शिवसेनेमधून बंडंखोरी करत बाहेर पडल्याने शिवसेनेत फूट पडली आहे. जवळपास 50 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

    भाजपासोबत युती या एकाच मागणीवर हे आमदार आडून बसले आहेत. दरम्यान या सर्व बंडखोर आमदारांना गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये ठेवण्यात आले आहे. बंडखोर आमदारांनी शिवसेनेत परत यावे यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी गुवाहाटीला गेलेल्या एका शिवसेनेच्या नेत्याला आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय भोसले असे त्यांचे नाव आहे. ते शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख आहेत.

    गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना ठेवण्यात आले आहे. या आमदारांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले हे त्या हॉटेलजवळ पोहोचले होते. मात्र त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    संजय भोसले हे या आमदारांना परत मुंबईमध्ये परतण्याचे आवाहन करणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान आता एकनाथ शिंदे यांचे परडे आणखी जड होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेच्या गटात आता अवघे 13 ते 14 आमदार राहिल्याची माहित समोर येत आहे.

    दरम्यान आम्हीच जिंकणार असल्याचा निर्धार संजय राऊत यांनी केला आहे. हाऊसमध्ये देखील आम्ही जिंकू असेही राऊत यावेळी म्हणाले. आम्ही त्यांना परत येण्यासाठी दिलेली वेळ संपली आहे, ‘लढाई रस्त्यावर झाली तरीही आम्हीच जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावं. त्यांना परत येण्याची संधी दिली होती. पण आता वेळ निघून गेली आहे,’ असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकू असा दावा सुद्धा राऊतांनी केला आहे.