आदित्य ठाकरे बाबत रिया तेव्हा काय म्हणाली होती? सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात पुन्हा जुन्या कढीला उत

    मुंबई : खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी संसदेत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शेवाळे यांनी तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले असून आदित्य ठाकरे यांचे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे यांच्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात पुन्हा जुन्या कढीला उत आला आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी सुशांतच्या मृत्यूबाबत खुलासा करताना रिया आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाली होती याचा व्हिडिओ पुन्हा एकदा समोर येत आहे.

    काय म्हणाले राहुल शेवाळे?

    ड्र्ग्जवर लोकसभेत चर्चा सुरु असताना, सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूबाबत संसदेत अनेकांनी चिंता व्यक्त केली होती त्याताच धागा पकडत राहुल शेवाळे म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि नंतर सीबीआयनंही चौकशी केली होती. मात्र देशवासियांच्या मनात या प्रकरणी अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरं अद्याप मिळालेली नसल्याचं राहुल शेवाळे म्हणालेत. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाची सध्याची स्थिती काय आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

    तसेच रिया चक्रवर्ती राज्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या संपर्कात ती होती का, त्याच्याशी तिची मैत्री होती का, असा सवालही शेवाळेंनी विचारलाय. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला ४४ कॉल हे AU नावाने आले होते. तपासात हे नाव अनन्या असल्याचं सांगण्यात आलं. मात्र बिहार पोलिसांच्या तपासात हे आदित्य उद्धव असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात आदित्य उद्धव ठाकरेंची चौकशी करण्यात आली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरेंचा विषय गंभीर आहे. या प्रकरणात महाराष्ट्र पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआय यांचे तपास वेगवेगळे आहेत. याबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे. याचं उत्तर जनतेला मिळायला हवं, असे राहुल शेवाळे यांनी संसदेत म्हंटले.

    आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाल होती रिया?

    सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू पश्च्यात रिया चक्रवर्तीने आदित्य ठाकरेंशी केलेल्या कथित फोन कॉलबाबत आणि त्यांच्या ओळखीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना खुलासा केला होता. रियाने सांगितले होते की, माझी मैत्रीण अनाया उदास जिचं नाव मी माझ्या फोन मध्ये ‘AU’ म्हणून सेव्ह केलं होत. मात्र काही लोक या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी AU ला ‘आदित्य उद्धव’ म्हणून संबोधत आहेत. या AU बाबत मैत्रीण अनाया उदासने तसेच आम्ही देखील अनेकदा खुलासा करून झालेलो आहोत, पण माहित नाही का? आदित्य ठाकरेंचं नाव माझ्याशी आणि या प्रकरणाशी जोडलं जात आहे. तसेच पत्रकाराने आदित्य ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर, रियाने मी आदित्य ठाकरेंना यापूर्वी कधीही भेटली नसून त्यांच्याशी कधीही प्रत्यक्षात अथवा फोनवर बोलणं न झाल्याचे सांगितले. तसेच आदित्य ठाकरे पॉलिटिकल प्रेशर आणून या प्रकरणा तुला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत का? या प्रश्नावर रियाने नकार दिला. रिया म्हणाली, की मला कोणीही प्रोटेक्ट करत नाहीये. उलट मला हवय कि कोणीतरी पुढे येऊन मला आणि माझ्या कुटुंबाला प्रोटेक्ट कराव कारण माझं आयुष्य माझं कुटुंब या प्रकरणामुळे उध्वस्त होत आहे.

    राजकीय व्यक्तींशी संबंधांबाबत रिया म्हणाली की, माझे कोणतेही पॉलिटिकल कॅनेकशन्स नाही आहेत. मी कधी कोणत्या राजकीय व्यक्तींना भेटलेली नाही , केवळ त्यांना टीव्हीवर पहिले आहे आणि त्यांच्याबद्दल तेवढंच ठाऊक आहे. तसेच सिबीआयकडे ही केस आलेली आहे तेव्हा मला विश्वास आहे की ते सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाबाबत सत्य शोधून काढतील.