पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का?; मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

पंकजा मुंडे यांना योग्य स्थान व प्रतिनिधित्त्व शिवसेनेत मिळेल, असा विश्वास समाजाला आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच राहील. प्रवेश केल्यानतंर त्यांना काय पद द्यायचे, हे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील, असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

    जळगाव : संपूर्ण महाराष्ट्राला मुंडे यांच्या परिवाराच्या कामाची माहीती आहे. त्यामुळे मुंडे यांच्या वारसदाराला न्याय व सन्मान मिळायलाच हवा, अशी समाजाची अपेक्षा आहे. या अनुशंगाने भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांना स्थान व सन्मान मिळेल तसेच त्यांचे शिवसेनेत स्वागतच होईल, असे मत शिवसेनेचे उपनेते व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात व्यक्त केले. जळगाव जिल्ह्यातील कीनोद गावात मंत्री गुलाबराव पाटील हे आज शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी आले होते.

    दरम्यान या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी पंकजा मुंडे यांच्यसंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी त्यांच्या मागणी करत सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी आपले मत मांडले.

    नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

    यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगीतले की, मुंडे परिवाराचे कार्य आभाळाऐवढे मोठे आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून हवे तसे प्रतिनिधित्त्व मिळाले नाही. मुळात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी अडचणीच्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे जे आधी भाजपमध्ये होते तसेच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना भाजपने तिकिट दिले नव्हते. अर्थातच ओबीसी समाजाचे भाजपकडून कुठेतरी खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप देखील गुलाबराव पाटील यांनी यांनी यावेळी केला.

    मुंडे यांना योग्य स्थान व प्रतिनिधित्त्व शिवसेनेत मिळेल

    मुंडे यांच्या वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांना योग्य स्थान व प्रतिनिधित्त्व शिवसेनेत मिळेल, असा विश्वास समाजाला आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच राहील. प्रवेश केल्यानतंर त्यांना काय पद द्यायचे, हे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील, असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.