कोल्हापुरातील निर्बंधाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय; सोमवारपासून आता…

    कोल्हापूर : सोमवारपासून जिल्ह्यातील दुकाने चालू होणार की नाही याची सर्वानाच प्रतीक्षा लागली होती. ही प्रतिक्षा संपुष्टात आली असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सरसकट दुकाने सोमवारपासून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना या शनिवार व रविवार बंद राहतील.

    जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यानं प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवले होते. राज्य सरकारने शहर आणि ग्रामीण असे दोन प्रशासकीय विभाग करून शहरातील सर्व दुकाने सरसकट खुली करावी, अशी मागणी व्यापारांनी केली होती. याबाबत व्यापारी संघटना आणि कोल्हापूर पोलीस दलाची संयुक्त बैठक पार पडली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. शहरातील विविध व्यापारी संघटनांनी देखील यासंदर्भात राज्य सरकारकड पाठपुरावा केला होता.

    दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध व्यापारी संघटनांचे म्हणणे आणि कोल्हापुरातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. राज्य सरकारने कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने 5 ते 9 तारखेपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, जिल्हा प्रशासनाने पुन्हा शटर बंद केली आता तब्बल तीन महिन्याने राज्य सरकारने दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली होती .