मराठा आरक्षणावर राज्य सरकारने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी : संभाजीराजे छत्रपती यांची मागणी 

३६ जिल्ह्यात आंदोलन करूनही सरकारने दखल घेतली नाही तर काय करायचे, आपण बांगड्या भरल्या आहेत का? दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा. पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढायचा. पण ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा संभाजीराजेंनी दिला. 

    कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. आता कुणाच्या चुका काढायच्या नाहीत. पहिल्यांदा राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. कलम ३३८ बी मधून पुन्हा मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध केले पाहिजे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील सर्व समन्वयकांची बैठक झाली. १६ जूनला मराठा आंदोलन करण्यात येणार आहे त्यावर चर्चा करण्यात आली.

    कोल्हापुरातून १६ जूनला पहिला मराठा मूक मोर्चा

    खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी  आंदोलनाची दिशा जाहीर करताना १६ जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतय” अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावे लागेल, असे संभाजीराजे म्हणाले.

    मुंबईत कोणी किंमत दिली नाही

    ते म्हणाले की, मी मुंबईत मांडलेल्या मुद्यावर विचारही झाला नाही, कोणी किंमत दिली नाही. अजित पवार यांनी फक्त फोन केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न केला. शाहूंच्या भूमीतून आंदोलन व्हावी अशी माझी भूमिका आहे. १६ तारखेला आपण समाजासमोर कसे जाणार आहोत. मला समजून घ्या मी जी भूमिका घेईन ती समाजाच्या हिताची असेल. आंदोलनाचे नेतृत्व आपण करू हे सांगताना ते म्हणाले की, माझे उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले जमते तसेच फडणवीस आणि अजित पवार यांच्याशीही जमते.

     पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च

    ३६ जिल्ह्यात आंदोलन करूनही सरकारने दखल घेतली नाही तर काय करायचे, आपण बांगड्या भरल्या आहेत का? दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा. पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढायचा. पण ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

    ते म्हणाले की, आता टेक्निकली डोके लावून पुढची भूमिका घेतली पाहिजे. आता पहिली जबाबदारी माझी, त्यानंतर खासदार आणि त्यानंतर आमदारांची आहे. तुम्ही समाजासाठी काय करताय हे आमदार खासदारांना कोणी विचारलं का? ही दिशा फक्त कोल्हापूरसाठी नाही तर राज्यासाठी असेल. ही भूमिका आक्रमक असेल पण टेक्निकल असेल, असं संभाजीराजे म्हणाले.

    १२ तारखेला कोपर्डीला जाणार

    ते म्हणाले की, चुका काढण्यापेक्षा या राजकीय नेत्यांनी मार्ग सांगितले पाहिजेत. राजकीय खेळ सुरू झाल्यानेच मी आक्रमक भूमिका घेतली, असे संभाजीराजेंनी सांगितले. कोल्हापूरनंतर नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड अशा क्रमाने मोर्चे होतील. १२ तारखेला कोपर्डीला जाणार, तसेच जलसमाधी घेतल्या काकासाहेब शिंदे स्मारकालाही जाणार. आम्ही आमचा आक्रमकपणा सोडणार नाही. आमच्याशी खेळ करू नका, असा निर्वाणीचा इशारा संभाजीराजेंनी दिला.