महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यातील शूर जवान प्रवीण जंजाळ यांना सोमवारी नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी लढताना त्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले होते.
प्रवीण जंजाळ हे महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात त्यांच्या आई शालू जंजाळ आणि पत्नी श्यामबाला जंजाळ यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
Jammu– Kashir history: हिंदू बहुसंख्यांक जम्मू-कश्मीरात मुस्लिमांची …
प्रवीण जंजाळ यांच्या शौर्याची माहिती समारंभात वाचून दाखवण्यात आली. आपल्या मुलाच्या पराक्रमाची कहाणी ऐकताना आई शालू जंजाळ यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कीर्ती चक्र स्वीकारण्यासाठी त्या राष्ट्रपतींच्या व्यासपीठाजवळ पोहोचल्या तेव्हा त्यांना रडू अनावर झाले. हा हृदयस्पर्शी क्षण पाहून उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना धीर देत आलिंगन दिले. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहीद जवानाच्या आईचे दुःख आणि अभिमान यांचा संगम असलेला हा क्षण प्रत्येकाच्या मनाला भिडणारा ठरला.
Four Star of Destiny Book : जनरल नरवणे यांच्या पुस्तकात असं आहे तरी …
प्रवीण जंजाळ हे 6 जुलै 2024 रोजी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम भागात दहशतवादविरोधी मोहिमेत सहभागी होते. संशयास्पद हालचाली दिसताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सतर्क केले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. मात्र प्रवीण यांनी न घाबरता त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. मात्र चकमकीदरम्यान त्यांच्या डोक्यात गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. तरीही त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढा सुरू ठेवला. देशरक्षण करताना त्यांनी वीरमरण पत्करले.
अवघ्या 24 व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शिपाई प्रवीण जंजाळ यांच्या अद्वितीय शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीच्या गौरवार्थ त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांचे बलिदान देशवासीयांना कायम प्रेरणा देत राहील.






