कोरोनाबाबत दुसऱ्यांदा संसर्गाचा धोका नाही ही बाब अंतिम सत्य समजणं चुकीचं आहे. विविध संशोधनांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे.
नवी दिल्ली : एकदा कोरोनाचा (coronavirus) संसर्ग (infection) होऊन गेला, की मग निश्चिंत झालो, कारण अँटीबॉडीजचं (antibodies) सुरक्षाकवच वाचवणार, आता आपल्याला काहीच होऊ शकत नाही. अशा विविध भ्रमांमध्ये असाल तर वेळीच सावध व्हा. एका तज्ज्ञांचं (expert) मत वाचून तुमची मती खुंटली नाही तर नवलंच.
Indian Express ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोरोनाचा एकदा संसर्ग होऊन गेल्यावर ती व्यक्ती पुन्हा एकदा संसर्गाला बळी पडल्याच्या बातम्या आता येऊ लागल्या आहेत. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातल्या डॉ. अनिता मॅथ्यू म्हणतात, ”कोरोनाचा एकदा संसर्ग झाल्यावर निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज किती काळ टिकतात हे समजून घेण्यासाठी अजून खूप संशोधन होण्याची गरज आहे. आणि या अँटीबॉडी पुन्हा एकदा संसर्ग झाल्यावर लढण्यासाठी सक्षम आहेत का हेसुद्धा पाहिलं पाहिजे.
”संशोधक सतत सांगत आहेत, की अँटीबॉडीजचं आयुष्य आणि क्षमता सखोलपणे तपासत राहण्याची गरज आहे. यात ज्यांना अलीकडेच कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा लोकांच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या पाहिजेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात (ICMR) ज्यांच्यावर उपचार झालेत त्यांच्यात दुसऱ्यांदा संसर्ग होतोय अथवा नाही यावर नजर ठेऊन आहे. त्यातील दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्यांचा अभ्यासही इथले संशोधक करत आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की अँटीबॉडीजवर विसंबून चालणार नाही. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन’ म्हणते त्याप्रमाणे, या अँटीबॉडीज म्हणजे काही ‘इम्युनिटी पासपोर्ट’ नाहीत.” असं त्या पुढे म्हणाल्या.
“अँटीबॉडीजविषयी कुठलेच फॅक्ट बेस्ड पुरावे समोर आलेले नाहीत. त्याऐवजी आपण आता लसीकरणाच्या टप्प्याबद्दल बोललं आणि समजून घेतलं पाहिजे.” असंही डॉ. मॅथ्यू यांनी सांगितलं.