पाणी आणि आपले आरोग्य या विषय थोडक्यात माहिती जाणून घ्या

    पाणी म्हणजे जीवन मानलं जातं. शरीराला अत्यंत आवश्यक असा हा घटक आहे. मात्र गरज नसताना पाणी प्यायल्यामुळे किंवा चुकीच्या वेळेस पाणी प्यायल्याने त्याचा उपयोग होण्याऐवजी दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच पाणी पिताना काही गोष्टींची, विशेषत: पाणी कधी पिऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.
    निरोगी जीवनासाठी योग्य आहारविहाराच्या बरोबरीने, योग्य प्रमाणात पाणी पिणंही आवश्यक असतं. मात्र बरेचजण एक चूक अगदी सर्रास करताना दिसतात आणि ती म्हणजे, अमूक लिटर, अमूक इतके ग्लास पाणी दिवसभरात संपवलंच पाहिजे हा विचित्र नियम पाळणं.
    शिवाय हा नियम पाळताना चुकीच्या वेळात पाणी पितच रहाणं सुद्धा अपायकारक आहे. पाणी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेच. मात्र ते पिताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. किती पाणी प्यावं याचबरोबर ते कधी प्यावं हेदेखील लक्षात घ्यायला हवं.

    आपलं शरीर म्हणजे एक चमत्कारिक यंत्रच आहे. त्याच्या गरजा ते योग्यवेळी व्यक्त करतं आणि तितकीच ती भागवतंही. भूक लागल्याशिवाय जेवू नये आणि तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये. अनेकजण उगाचंच तहान लागलेली नसली तरीही सतत पाणी पितच राहतात. हे शरीराच्या रचनेविरूध्द आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की घशाला कोरड पडेपर्यंत वाट बघावी.
    चुकीच्या वेळी पाणी पिणं आणि पाण्याच्या अतीसेवनानं शरीरातल्या मिठाचं अर्थात सोडीयमचं संतुलन बिघडतं. याला Hyponatremia असं म्हणतात. यामुळे कधी कधी गंभीर समस्या उद्भवू शकतात.

    झोपण्यापूर्वी
    अनेकांना झोपण्यापूर्वी पाणी, ग्रीन टी, चहा, कॉफी असं काहीतरी पिण्याची सवय असते. मात्र झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास तरी पोटात कुठलाही द्रवपदार्थ जाऊ देऊ नये. झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यानं झोपेत व्यत्यय येतो. जास्त वेळा लघवीला जाण्याच्या शक्यता निर्माण होतात. म्हणूनच झोपण्यापूर्वी अर्धा तास पोट रिकामं असावं. यामुळे झोपही शांत लागते. दिवसाच्या तुलनेत रात्री आपल्या किडण्या मंदपणे काम करत असतात. याच कारणामुळे सकाळी उठल्यावर बरेचदा चेहरा सुजलेला दिसतो. त्यात जर झोपण्यापूर्वी पाणी प्यायलं तर ही सूज वाढण्याची शक्यता असते.

    व्यायाम करत असताना
    तज्ज्ञांच्यामते व्यायामाच्या दरम्यान पाणी प्यायल्यानं त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता बळावते. व्यायाम करत असताना शरीराचं तापमान वाढलेलं असतं. यावेळेस जर थंड पाणी जास्त प्रमाणात प्यायलं तर electrolyte depletion ची शक्यता असते. याची लक्षणं म्हणजे, डोकं दुखणे, मळमळ, थकवा जाणवणे. शक्यतो व्यायाम झाल्यावरच पाणी प्यावे आणि व्यायामा दरम्यान तहान लागलीच तर दरम्यान भरपूर पाणी न पिता घोट घोट पाणी प्यावे.

    लघवीला रंग नसेल तर
    आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत की नाही? याची सोपी टेस्ट म्हणजे, लघवीचा रंग तपासणे. जर तो फिका पिवळट असेल तर आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत.
    जर लघवीला रंगच नसेल आणि ती पाण्यासारखीच पारदर्शक असेल, तर मात्र पाण्याचं अतिरिक्त सेवन होत आहे. अर्थात हे सातत्याने होणं योग्य नाही. असं होत असेल, तर पाणी कमी प्यावं. पाण्याच्या अतिसेवनामुळे सोडियमची कमतरता जाणवू लागते आणि कधी कधी ह्रदविकाराचा झटका येण्याची शक्यताही असते.

    सकाळी रिकाम्यापोटी
    अनेकांचा असा समज असतो की सकाळी उठल्यावर अनुशापोटी म्हणजे पोट रिकामं असताना भरपूर पाणी प्यावं. हे अगदी चूक आहे. रिकाम्या पोटी जास्तीत जास्त एक लिटरपर्यंत पाणी प्यावं. अनुशापोटी पाणी पिणं लाभकारक असलं तरीही लिटरच्या लिटर पाणी पिणं असा त्याचा अर्थ नाही. तसेच गार पाण्याऐवजी कोमट पाणी प्यायलं तर आरोग्याच्या दृष्टिनं ते जास्त लाभकारक ठरेल.