बापरे! कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू

भारतात आतापर्यंत चार वेळा निपाह व्हायरस समोर आला आहे. निपाह व्हायसरवर कोणतंही औषध किंवा लस नसून तो सर्वात धोकादायक मानला जातो. यामध्ये मृत्यूदरही खूप आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचा मृत्यूदर एक ते दोन टक्के असून निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर हा ६५ ते १०० टक्के इतका आहे.

    गेल्या दीड वर्षांपासून अवघे जग कोरोना विषाणूशी लढत आहे. या विषाणूला प्रतिबंधित करण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आहे. भारतातही कोरोनाची दुसरी लाट आता काही प्रमाणात ओसरत आहे. काही प्रमाणात कोरोनाची चिंता कमी होत असतानाच आता एक नवीन धक्कादायक बातमी समोर आली आहे.महाराष्ट्राच्या महाबळेश्वर येथे वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली असून महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रजातींच्या वटवाघुळांचे नमुने घेत संशोधन केलं होतं.

    केरळमध्ये मृत्यूतांड्व
    दरम्यान या अभ्यासाचे प्रमुख असणारे डॉक्टर प्रज्ञा यादव यांनी याआधी महाराष्ट्रात वटवाघुळाच्या कोणत्याही प्रजातीत निपाहचे विषाणू आढळले नव्हते अशी माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने रोगांच्या यादीत पहिल्या १० मध्ये निपाह व्हायरसला ठेवलं असून हा खासकरुन वघटवाघुळांमध्येच आढळतो. माणसांपर्यंत हा विषाणू पोहोचल्यास मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची शक्यता असते. २०१८ मध्ये केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे मृत्यूतांडव झाला होता. याआधी भारतात २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये निपाह व्हायरस आढळला होता. तसंच आसाममध्येही निपाहचे रुग्ण आढळून आले होते.

    लस उपलब्ध नाही
    एनआयव्हीने नुकताच अभ्यासात समोर आलेली माहिती प्रसिद्ध केली आहे. यानुसार भारतात आतापर्यंत चार वेळा निपाह व्हायरस समोर आला आहे. निपाह व्हायसरवर कोणतंही औषध किंवा लस नसून तो सर्वात धोकादायक मानला जातो. यामध्ये मृत्यूदरही खूप आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचा मृत्यूदर एक ते दोन टक्के असून निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर हा ६५ ते १०० टक्के इतका आहे.गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघुळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते ज्यामुळे आरोग्यव्यवस्था कोलमडली होती. करोनाच्या उद्रेकामागेदेखील वटवाघूळ असल्याचाच दावा आहे.