पंढरपुरात मराठा समाजातील तरुणांचे अर्धनग्न होऊन आंदोलन, राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन
सोलापूर - मराठा समाजास आरक्षणाची गरज नाही असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टानं आज मराठा समाजाला देण्यात आलेला आरक्षण कायदा रद्द केलं आहे. या निर्णयाच्या विरोधात पंढरपुरातील मराठा समाज आक्रमक झाला असून पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी आंदोलन सुरू केलं आहे. काही बांधवांनी अर्धनग्न होऊन सरकार विरोधात रोष व्यक्त करीत सामुहिक मुंडण आंदोलन केलं आहे.
मराठा आरक्षणाचा आजचा निकाल म्हणजे राज्य सरकारचं अपयश : चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र सरकारचा मी निषेध करतो. मराठा आरक्षणाचं काय करावं यासाठी राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणाचा आजचा निकाल म्हणजे राज्य सरकारचं अपयश, अशी टीका चंद्रकांत पाटील केली आहे.
उच्च न्यायालयात फडणवीस सरकारने हे आरक्षण टिकविले. महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाला ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण का हवे हे पटवून देता आलेले नाही. यामुळे मी सरकारचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या तरुण-तरुणींनी एकत्र येऊन राज्य सरकारला जाब विचारला पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यास ठाकरे सरकारला अपयश : आशिष शेलार
मराठा आरक्षणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यास ठाकरे सरकारला मोठं अपयश आलं आहे , अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
इंदिरा सहाणींच्या मोठ्या बेंचच्या जजमेंटनं विशेष परिस्थिती ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण दिलेलं होतं. त्या आधारावर देवेंद्र फडणवीस सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. त्या आयोगासमोर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, सर्व राज्यातील संघटनांकडून डाटा जमा करण्याचा अभ्यास फडणवीस सरकारकडून झाला. त्यावेळी विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं त्या संस्था संघटनांना विरोध केला. तसेच मविआ सरकारनं मराठा समाजाचा अपेक्षाभंग केला. असं आशिष शेलार म्हणाले.
राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत , अशोक चव्हाणांनी प्रायश्चित घ्यावं : प्रविण दरेकर
मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस आहे. कोर्टाचा निकाल आला आहे त्याला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच अशोक चव्हाणांनी प्रायश्चित घ्यावं, ठाकरे सरकारनं याला सामोरं जावं, असं आव्हान प्रविण दरेकर यांनी दिलं आहे.
मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस : खासदार संभाजीराजे
मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस आहे. हा निर्णय दुर्दैवी आहे. सर्व सरकारांनी त्यांची बाजू मांडली आहे. मागील सरकारनं कायदा मंजूर केला. सगळ्यांनी बाजू मांडली. मात्र, न्यायालयाच्या निकालाचा आदर करा, असं खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.
पुढे म्हणाले की, उद्रेक हा शब्दही काढू नका, कारण कोरोनाचा प्रकोप वाढत असल्यामुळे संयम बाळगा. असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : मराठा आरक्षण (Maratha Reservation Case) रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं. ५० % ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण अवैध असल्याचं कोर्टाने सांगितलं.
मराठा आरक्षणावरील सुनावनीला सुरुवात
आजचा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. राज्य सरकारनेही यासाठी मोठी ताकद लावली आहे.
मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं लाईव्ह अपडेट
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी 10:30 वाजता अंतिम सुनावणी होणार असून आज या मुद्द्याचा सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सकाळी 9:30 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. त्यात मंत्रीमंडळ उपसमितीचे मंत्री सहभागी होणार आहेत. 26 मार्चला झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्यावर आता मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे.
मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे.