राज्य सरकारकडून अनलॉकच्या नियमावलीत बदल,सगळे जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच – काय सुरु आणि काय बंद जाणून घ्या

राज्य सरकारकडून(State Government made changes in Unlock Guidelines) आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

    मुंबई: महाराष्ट्रात(Maharashtra Unlock) ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांमध्ये डेल्टा प्लस करोना विषाणू आढळून आल्यामुळे आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून(State Government made changes in Unlock Guidelines) आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

    राज्यात ४ जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती. यामध्ये त्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण विचारात घेऊन सर्वात कमी दर असणारे जिल्हे पहिल्या गटात यानुसार पाचव्या गटापर्यंत विभागणी करण्यात आली होती.

    तिसऱ्या टप्प्यातील नियम संपूर्ण राज्यात सोमवारपासून लागू होणार आहेत. राज्यातील कोणताही जिल्हा तिसऱ्या टप्प्याच्या खाली नसणार आहे. म्हणजेच आता राज्य आता मिनी लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान राज्यातील जिल्ह्याची विभागणी पाच टप्प्यात होत होती. दर शुक्रवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पाच टप्प्यात विभागले जात होते. त्याचप्रमाणे आज देखील आढावा घेऊन सरकारने जारी केलेल्या नियमावलीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला गेला. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होणार आहे. म्हणजे सर्व जिल्हे, महापालिका तिसऱ्या टप्प्याच्या वरती असणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या खाली नसणार आहेत.

    असे असतील तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध

    • अत्यावश्यक दुकाने दुपारी ४ पर्यंत खुले राहतील.तसेच इतर दुकाने दुपारी ४ पर्यंत खुले राहतील. पण शनिवार-रविवारी पूर्णपण बंद असतील.
    • मॉल, चित्रपटगृह बंद.
    • हॉटेल्सना दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी, परंतु शनिवार-रविवार बंद.
    • उद्याने, मैदाने, जॉगिंग पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत सुरू राहतील.
    • सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी.
    • खासगी कार्यालये (परवानगी मिळाल्यास) ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
    • चित्रीकरणाला बायो बबल वातावरणात परवानगी.
    • संध्याकाळी ५ वाजल्यानंतर बाहेर जाण्यास परवानगी नाही.
    • सार्वजनिक वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील. उभ्याने प्रवास करता येणार नाही.
    • जीम, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
    • लग्नाच्या हॉलला ५० टक्के क्षमतेने खुले राहण्यास परवानगी देण्यात येईल. कमाल १०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असेल.
    • अंत्यसंस्कार विधीला २० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल.