आता शाळा होणार विलगीकरण केंद्र ; कोरोना योद्धा होण्याची शिक्षकांची तयारी

मुंबई : कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेल्या केंद्रीय पथकाने मुंबईमध्ये संस्थात्मक विलगीकरण केंद्र वाढवण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णाची संख्या

मुंबई  : कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेल्या केंद्रीय पथकाने मुंबईमध्ये संस्थात्मक विलगीकरण केंद्र वाढवण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णाची संख्या  पाहता पालिकेने विलगीकरण केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विलगीकरण केंद्र पालिकेच्या शाळांमध्येच सुरु करण्यात येणार आहेत. या अलगीकरण केंद्राची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात येणार आहे. मात्र मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझर यासारख्या सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. 

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढती संख्या लक्षात घेत पालिकेने शाळांमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षासाठी वापरता येणाऱ्या शाळांची यादी तयार करण्याचे निर्देश पालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शाळा निरीक्षक व अधिक्षकांना परिपत्रकाद्वारे दिले आहेत. 

यामध्ये सर्व क्षेत्रीय उपशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखालील पालिका शाळा, भाड्याच्या, भाडेविरहित तसेच इस्टेटच्या शाळा इमारतींचा विचार करावा. तसेच शाळा मोडकळीस आलेली नाही किंवा दुरुस्तीचे काम सुरु नाही याची खातरजमा करण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विलगीकरण कक्षासाठी देण्यात येणाऱ्या शाळांमध्ये स्वच्छतागृहे, पंखे, पाणी इतर सोयीसुविधा नसतील तर तातडीने त्या दिल्या जाव्यात आणि या समस्या तातडीने सोडवला जाव्यात. तसेच प्रत्येक शाळेत शिक्षकाची शाळा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात यावी. त्यामुळे जे शिक्षक, मुख्याध्यापक गावी गेले असतील त्यांना कामावर येण्यासाठी आवश्यकतेनुसार लेखी आदेश देण्यात यावे असे निर्देश त्यांना उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक यांना परिपत्रकाद्वारे दिले आहेत. 

आरोग्य सुरक्षा कवच, सुविधा पुरवण्याची मागणीपालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी शाळांमध्ये अलगीकरण कक्ष सुरु करण्याचे तसेच शिक्षकांना नेमण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या परिपत्रकाने शिक्षका मधे भीतिचे वातावरण पसरले आहे.

 मुंबईतील   परिस्थिती पाहता शिक्षकाना योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता खबरदारीचा उपाय वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितला पाहिजे. या कामासाठी शिक्षकांना आरोग्य सुरक्षा कवच आणि साधने उपलब्ध करुन दिली पाहिजे.

 पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ल्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. अशावेळी सरकारने योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या उपाययोजनांची अंमलबजावणी, त्यासोबतच येण्याजाण्यासाठीची सोय केली जावी, अशी मागणी शिक्षक करत आहेत.