राज्य सरकारच्या मोफत लसीकरणाच्या निर्णयाचे स्वागत; काँग्रेस नेत्यांकडून समाधान व्यक्त

काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांची मागणी मान्य करून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा घेतलेला निर्णय रास्त असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.  याबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत. यापूर्वी मंत्रिमंडळात या मुद्यावर उलट सुलट वक्तव्ये आल्याने थोरात यांनी नाराजी बोलून दाखवली होती.

    मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांची मागणी मान्य करून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा घेतलेला निर्णय रास्त असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.  याबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत. यापूर्वी मंत्रिमंडळात या मुद्यावर उलट सुलट वक्तव्ये आल्याने थोरात यांनी नाराजी बोलून दाखवली होती.

    मंत्रिमंडळांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी पर्याय आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांचे मोफत लसीकरण केले जावे असा आग्रह कायमच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी धरला होता. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वयाच्या नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.  अशी माहिती देतानाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केल आहेत

    तर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न होता ही मोहिम सुरुळीत पार पडावी यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन केले आहे. यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच खा. राहुल गांधी यांनी कोरोना प्रतिबंधक लस ही सर्वांना मोफत द्यावी अशी आग्रही मागणी केली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मोफत लसींसाठी आग्रही भूमिका मांडत पाठपुरावाही केला. कोरोनावर मात करण्यासाठी लस हेच प्रभावी शस्त्र आहे. जगभरातील अनेक देशांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जात असताना केंद्र सरकार मात्र त्याबाबत चालढकल करत होते. केंद्र सरकारने शेवटी १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला परंतु त्याची जबाबदारी मात्र राज्य सरकारवरांवर ढकलून जनतेला वा-यावर सोडले आहे. पण महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मात्र सोनियाजी गांधी यांची मागणी मान्य करून मोफत लसीकरणाचा निर्णय घेऊन जनतेप्रति आपली बांधिलकी जपली आहे.

    पटोले म्हणाले की, महाराष्ट्राने आतापर्यंत १.५० कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करून देशात आघाडी घेतली आहे. राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे. दररोज आठ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. आता केंद्र सरकारने कोणताही दुजाभाव न करता महाराष्ट्राला लसींचा मुबलक पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी असे नाना पटोले म्हणाले.